गाथा विकासाची-जनतेच्या सन्मानाची-(भाग-1)



महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
दूरध्वनी -222019,
Facebook-dioraigad
मेल - dioraigad@gmail.com
Twweter-@dioraigad ब्लॉग :  dioraigad
दिनांक :-  07 ऑक्टोबर 2016                                                    लेख क्र-49
गाथा विकासाची-जनतेच्या सन्मानाची-(भाग-1)

            परिवर्तनाची चक्र आम्ही फिरवत आहोत.   यंत्रणा अधिक पारदर्शक, प्रभावी आणि सहभागशील करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत.  याचा देशातल्या प्रत्येक नागरिकाला फायदा होईल असा जनताभिमुख विचार आणि त्यानुसार करण्यात येणारे आचरण अथवा कृती.  यामुळे दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत असलेले आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे.   
               या कालावधीत देशाच्या विकासास  पुरक आणि जनतेच्या विश्वासास महत्वपूर्ण अशा काही योजनांद्वारे त्यांनी साद दिली. त्यास अपेक्षित असा प्रतिसाद संपूर्ण देशातून मिळाला असून विकासाची नवी दिशा यातून मिळाली.  तर देशातील तमाम जनतेला निश्चितच एक सन्मानजनक समाधान मिळाले.      त्याची थोडक्यात माहिती…


        जनतेतील प्रत्येक घटकाचा विचार करुन त्या घटकाच्या उन्नतीसाठी वेगवेगळया लोकाभिमुख योजना साकारल्या.  यात प्रामुख्याने सांसद आदर्श ग्राम योजना तसेच स्वच्छ भारत अभियान, पंतप्रधान जन धन योजना, मुद्रा योजना, दिनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, उज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, अटल निवृत्तीवेतन योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ आदि योजना आहेत.  या योजनांच्या रुपाने लावलेल्या बीजाचे रुपांतर आता छोट्या रोपट्यात झाले असून भविष्यात प्रत्येक रोपटयाचे विशाल वटवृक्ष होतील.  
सांसद आदर्श ग्राम योजना
रायगड जिल्ह्यात या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे.   सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत संसदेतील प्रत्येक खासदारांना आपल्या मतदार संघातून एका ग्रामपंचायतीची निवड करुन ते आदर्श गावात परिवर्तन करण्याची ही संकल्पना आहे.  त्यानुसार रायगड जिल्ह्यात केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी दिवे आगर, खासदार श्रीरंग बारणे यांनी बांधपाडा खोपटा तर खासदार डॉ.किरीट सोमय्या यांनी चिंचोटी या गावांची निवड केली. या गावात  लिंग समानता महिला विकास, सामाजिक न्याय, समाजाच्या सांस्कृतिक वारसाचे जतन संवर्धन, सामाजिक सहकार्य, लोकांच्या परिणामकारक सहभागासह, जबाबदार पारदर्शक प्रशासन देणे तसेच समाजात स्वच्छता, आरोग्य शिक्षण यांसह मानवी हक्कांच्या संबधीत क्षेत्रात विकास करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
स्वच्छतेचे अभियान
            स्वच्छ भारत अभियान हे सहजतेने सर्वांना साकारता येणारी जिचा परिणाम तात्काळ दिसणारी महत्वाकांक्षी योजना पंतप्रधानांनी देशाला दिली. या स्वच्छ भारत अभियानाची लोकचळवळ रायगड जिल्ह्यातही गतिमान झाली असून स्वच्छता प्रेमी व्यक्ती, संस्था, औद्योगिक कंपन्या, शासकीय यंत्रणा, शालेय विद्यार्थी, महिला बचत गट, अशा सर्वांच्या स्वच्छतेतील योगदानातून स्वच्छ रायगड-समृध्द रायगडचे स्वप्न सत्यात येणार आहे. आरोग्यदायी जीवनासाठी स्वच्छता महत्वाची. ज्याप्रमाणे आपण स्वत: स्वच्छ राहतो, स्वत:चे घर स्वच्छ ठेवतो त्यानुसार आपला मोहल्ला, आपले गाव, आपला परिसर, आपले कार्यालय स्वच्छ ठेवण्याची सरळ, सोपी आणि साधी अशी ही मोहिम आहे.







 सुदैवाने आपणास राज्याचे स्वच्छतादूत डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आशीर्वाद मिळाला असून त्यायोगे आपण ही योजना जिल्ह्यात हिरीरीने राबवित आहोत. या मोहिमेची सुरूवातच छत्रपती शिवरायांच्या रायगड किल्ल्याच्या स्वच्छतेनी केली.  तद्नंतर आतापर्यंत सातत्याने वेगवेगळया माध्यमातून जिल्हाभर स्वच्छतेसाठी उपक्रम राबविण्यात येत आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मार्च 2017 अखेर संपूर्ण कोकण विभागच स्वच्छ विभाग करावा असे सूतोवाच केले.  त्यांच्या शब्दाला सन्मान देण्यासाठी कोकण विभाग कटिबध्द असून विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनात सर्व जिल्हे हे अभियान राबवत आहेत. 
जन-धन योजना
पंतप्रधान जन-धन योजना ही संपूर्ण देशभरात 28 ऑगस्ट 2014 रोजी  सुरू झालेली महत्वकांक्षी योजना. या योजनेमुळे गरीबी संपून एका नव्या पर्वाचा उदय होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनेच्या  उद्घाटनप्रसंगी सांगितले असून यात देशभरात एकाच दिवशी जवळपास दीड कोटी बँक खाती 77 हजार 892 शिबिरांच्या माध्यमातून उघडली आहेत. तर तेवढ्या लोकांचा वैयक्तिक अपघात विमाही देण्यात आला आहे. ग्रामीण भागासाठी हे वित्तीय साक्षरतेचे महत्वाचे पाऊल आहे. रायगड जिल्ह्यातही अलिबाग मुख्यालयासह सर्वत्र या योजनेची घोडदौड सुरु असून  अग्रणी बँक इतर बँकांच्या माध्यमातून मे 2016 अखेर ग्रामीण व शहरी भागात 2 लाख 5 हजार 317 खाती उघडली आहेत. त्याद्वारे जिल्ह्यात महिला सन्मान आणि विकास याचा नवा अविष्कार घडत असल्याचे चित्र आपणास दिसून येईल.
 या प्रत्येक योजनेतून विकास, विकास आणि विकास हा एकच मंत्र असल्याचे दिसून येते. या महत्वाच्या व लोकाभिमुख  योजनांनी देशातील प्रत्येक नागरिकाला निश्चितपणे विकास, विश्वास आणि सन्मानाची नवी ओळख मिळत आहे.
(याखेरीज असलेल्या काही योजनांची माहिती पुढील भागात आपण वाचूया)

0000
             
डॉ.राजू पाटोदकर
जिल्हा माहिती अधिकारी

रायगड-अलिबाग

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत