जिल्ह्यात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सुरू असलेली सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत --खासदार श्रीरंग बारणे

 



 

अलिबाग, दि.24 (जिमाका): सर्वसामान्य गरजू नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे, हा त्यांचा हक्क आहे.  त्यांना हा हक्क मिळवून देणे हे शासकीय अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. यानुषंगाने जिल्ह्यात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सुरू असलेली सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत, अशा सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्व विभागाच्या खातेप्रमुखांना आज येथे केल्या.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) आढावा बैठक समिती अध्यक्ष खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवन येथे पार पडली. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार सुनील तटकरे,  सर्वश्री आमदार भरत गोगावले, आ.रविंद्र पाटील, आ.महेंद्र थोरवे, आ.महेश बालदी, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उपवनसंरक्षक (अलिबाग) आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक (रोहा) आप्पासाहेब निकत, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्यासह समिती सदस्य, विशेष निमंत्रित सदस्य व शासकीय विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधान मंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रम, प्रधान मंत्री आवास योजना (शहरी), स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम, जल जिवन अभियान, प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, डिजिटल इंडिया भूमि अभिलेख नुतनीकरण कार्यक्रम, दीन दयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, महामार्ग प्राधिकरण मार्फत सुरु असलेली महामार्गांवर कामे या योजनांच्या कामांचा आढावा घेवून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत तातडीने पात्र लाभार्थ्यांना घरकुल अनुदान देऊन घर बांधण्यास सहकार्य करावे, जिल्ह्यातंर्गत रस्ते तसेच महामार्गाच्या कामांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा कराव्यात, कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत सर्व कामे प्राधान्याने विहीत मुदतीत पूर्ण करावीत, नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात असलेल्या शहरे व ग्रामपंचायत हद्दीत सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवावेत, जिल्ह्यात शेतकरी, ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देत सर्व मूलभूत सोयीसुविधा गुणवत्तापूर्ण उपलब्ध करुन द्याव्यात, सिंचन विषयक सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, यासह इतर सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद पाणी व पुरवठा विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी केले.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत