समृद्ध, संपन्न महाराष्ट्र घडवू या - महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा मुख्य कार्यक्रम उत्साहात
रायगड (जिमाका)दि.1:- उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून आपण सर्वांच्या सहकार्याने समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्र ही ओळख अबाधित राहील, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री कु.आदिती वरदा सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय समारंभात कु.तटकरे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
तसेच महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना त्यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
आपल्या शुभेच्छा संदेशात कु.तटकरे म्हणाल्या शेती, औद्योगिक उत्पादने, व्यापार, दळणवळण आदी क्षेत्रात देशातील आघाडीच्या राज्यांपैकी एक असलेला महाराष्ट्र देशाचे आर्थिक शक्तीकेंद्र असून देशाच्या पायाभूत विकासात महाराष्ट्राने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
याप्रसंगी झालेल्या संचलनात रायगड जिल्हा पोलीस सशस्त्र बल, दंगल नियंत्रण पथक, सशस्त्र महिला पोलीस दल, महाराष्ट्र अग्निशमन सेवा वाहतूक पोलीस दल, पोलीस ब्रास बॅण्ड पथक, होमगार्ड पथक,श्वान पथक, वज्र वाहन, फॉरेन्सिक वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथकांनी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय 108 रुग्णवाहिका आदी सहभाग घेतला. संचालनाचे नेतृत्व परेड कमांडर श्री.शैलेश बाबुराव काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, रोहा विभाग दुय्यम परेड कमांडर पोलीस उप निरीक्षक, श्री. शिवराज शामराव खराडे, क्यूआरटी पथक यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000000
Comments
Post a Comment