कोकण विभागातील पहिला ‘अमृत आनंद मेळा’ वरसोली अलिबाग येथे उत्साहात संपन्न
रायगड-अलिबाग,दि.27 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील वरसोली, अलिबाग येथे कोकण विभागातील पहिला ‘अमृत आनंद मेळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत ) च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत वर्ग’ या किशोर विकास उपक्रमांतर्गत आयोजित या निवासी मेळाव्याला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शारंग हॉलिडे होम, वरसोली येथे 13 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुरू झालेला हा मेळावा 14 एप्रिलपर्यंत विविध उपक्रमांनी रंगला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुतार काका व अविनाश धाट काका यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली.
या मेळाव्यात बौद्धिक खेळ, संस्कारमूल्ये रुजविणारे उपक्रम, शारीरिक क्रियाकलाप तसेच प्रेरणादायी सत्रांचा समावेश होता. सौ. गुंजाळ ताईंनी मुलींकरिता स्वसंरक्षणाच्या दृष्टीने लाठी-काठी प्रशिक्षणाची ओळख करून दिली. सायंकाळी रामरक्षा, मारुती स्तोत्र आणि रामनाम जप अशा धार्मिक उपक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सौ.अनघा मराठे यांनी शारीरिक प्रशिक्षण सत्र घेतले तर श्री.श्रीनिवास केळकर गुरुजी यांनी आध्यात्मिक मार्गदर्शन केले. विश्व हिंदू परिषदचे अॅड. श्रीराम ठोसर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या बालपणावर आधारित संवाद साधत मुलांमध्ये विचारमंथन घडवले. तसेच सनातन संस्थेच्या सौ. विशाखा आठवले यांनी हिंदू संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले. मातृ प्रतिष्ठान, चौल येथील अजिंक्य शिंत्रे यांनी मानसिक, शारीरिक व बौद्धिक विकासासाठी आवश्यक व्यायाम व सवयींबाबत मार्गदर्शन केले. श्री स्वामी विवेकानंद समितीच्या श्रीमती गोखले आजी वय 75 नागाव अलिबाग त्यांनी दुपारच्या सत्रामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या गोष्टी सांगितल्या. मुंबई आकाशवाणीच्या वृत्तविभाग प्रमुख सौ. संगीता गोडबोले यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलांशी संवाद साधत अभ्यास पद्धती व विषयांबद्दल मार्गदर्शन केले.
मेळाव्यातील भोजन व्यवस्थाही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. मुलांच्या आवडीचे पदार्थ देण्यात आले. भोजनावेळी श्रीराम नाम जप व भोजन संस्कारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुलांनी आपल्या अनुभवांचे मनमोकळेपणाने कथन केले. “शिबिर अजून सुरू राहावे” अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. वंदे मातरम् व राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मंगेश ढेबे यांनी आभार प्रदर्शन केले.
या यशस्वी आयोजनात अमृत सखी जान्हवी साठे व अमृत मित्र अथर्व भातखंडे यांचे विशेष सहकार्य लाभले. पुढील काळात अशा उपक्रमांत पुन्हा सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करत सर्वांनी आनंदाने निरोप घेतला
0000000
Comments
Post a Comment