कौशल्य विकासातून उन्नती साधा-आयुक्त डॉ.जगदीश पाटील


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21:- आदिवासी युवक युवतींनी प्रशिक्षण केंद्रातून आपल्या आवडीप्रमाणे प्रशिक्षण घेऊन आपली कौशल्य विकसित करावी व रोजगार मिळवावा. यातून स्वतःची व राज्याची  उन्नती साधता येईल, असे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी आज कोठींबे ता. कर्जत येथे केले.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत नाग्या कातकरी प्रशिक्षण केंद्राचे कोठींबे ता.कर्जत येथे आज कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांच्या  हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या ठमाताई पवार या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. यावेळी प्रधानमंत्री कौशल्य विकास समन्वयक दिल्ली आशिष भावे. कर्जत येथील प्रांताधिकारी दत्ता भडकवाड, तहसिलदार अविनाश कोष्टी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. पाटील म्हणाले की, आदिवासी तरुण-तरुणींनी येथे  प्रशिक्षण घेऊन आपले उदरनिर्वाह  साधन सक्षम करावे आणि महाराष्ट्राला विकसित करावे.
आशिष भावे म्हणाले की, आदिवासी बांधवांनी लाकुड, वीटभट्टी किंवा मोलमजुरी हेच उपजिविकेचे मार्ग न ठेवता या केंद्राच्या माध्यमातून आपण कौशल्य विकास करुन रोजगार मिळवावा.
वनवासी कल्याण आश्रम, कोठींबा केंद्राचे  अद्ययावत सर्व सोयींनीयुक्त हुतात्मा नाग्या कातकरी प्रशिक्षण केंद्र नावाने नूतनीकरण करुन त्याचे उद्घाटन करण्यात आले. या प्रशिक्षण केंद्रात टेलरिंग, कंप्यूटर, डाटा एन्ट्री, ॲग्रिकल्चरल, मेडिसिनल प्लांट यासारखे कोर्स आयोजित करुन आदिवासी युवकांना प्रशिक्षीत करण्यात येणार आहे. केवळ कातकरी व ठाकूर समाजातील तरुणांना प्रशिक्षित करणारे हे राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र आहे. त्यांच्या रोजगाराच्या व प्रगतीच्या दृष्टीने  हा प्रकल्प उल्लेखनीय ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रवींद्र कर्वे, लक्ष्मणराव टोपले, रविंद्र पाटील, विनायक जोशी, विवेक सुर्वे आदींनी परिश्रम घेतले.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज