पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेची प्रवेशिका स्वीकारण्यास मुदतवाढ


अलिबाग, दि.15 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य या संकल्पेनवर मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेसाठी नागरिकांचा मिळालेला प्रचंड सहभाग पाहता भारत निवडणूक आयोगाने या स्पर्धेची प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम मुदत दि.31 मार्च 2022 केली आहे. पूर्वी ही मुदत दि.15 मार्च 2022 अशी होती.

सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्त्व पटवून देण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य या मध्यवर्ती संकल्पनेवर पाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेत ई-प्रमाणपत्रापासून रूपये 2 लाखापर्यंत आकर्षक अशी बक्षिसेही जाहीर केली आहेत.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी वयाचे बंधन नसल्याने भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी https://ecisveep.nic.in/contest/ या संकेतस्थळावर नोंदणी करून त्यांच्या प्रवेशिका voter-contest@eci.gov.in या ई-मेलवर कराव्यात. ई-मेल करताना विषयात स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा आवर्जून उल्लेख करावा, असे मुख्य निवडणूक अधिकारी आणि प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले आहे.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रश्नमंजुषा, घोषवाक्य, गीत गायन, व्ह‍िडिओ मेकिंग आणि भित्तिचित्र स्पर्धा अशा एकूण 5 प्रकारच्या स्पर्धा आहेत. भारत निवडणूक आयोगाकडून या स्पर्धेस मुदतवाढ मिळाली असल्याने जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी होऊन लोकशाही अधिक सक्षम करावी, असेही आवाहन श्री.देशपांडे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज