रायगडमध्ये 14 फेब्रुवारीला शासकीय योजनांचा महामेळावा विधी सेवा शिबिर, एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध
रायगड-अलिबाग,दि.10(जिमाका):- सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत 14 फेब्रुवारी 2026 रोजी अलिबाग येथील कुरूळ येथील आरसीएफ हॉल येथे भव्य ‘विधी सेवा शिबिर व विविध शासकीय योजनांचा महामेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तेजस्विनी निराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या महामेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि त्यांना योजनांचा थेट लाभ मिळवून देणे हे आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा न्यायालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडणार असून, कार्यक्रमात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत, जिल्हाधिकारी किशन जावळे तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलिस अधीक्षक आँचल दलाल आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
महामेळाव्यात विविध शासकीय विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. आरोग्य, शिक्षण, कृषी, समाजकल्याण, महिला व बालविकास, मत्स्यव्यवसाय, आदिवासी विकास, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), तसेच एसटी महामंडळ आदी विभागांमार्फत योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, केवळ माहितीपुरते न राहता पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जागीच भरून घेण्याची आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला देण्यात येणार असून, विविध कायदेशीर हक्क, सरकारी योजना, तसेच न्यायालयीन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जाईल. याशिवाय, निवडक लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात योजनांच्या लाभांचे वाटपही करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात निवडणूक विभागाचाही स्टॉल असणार असून, नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीत दुरुस्ती तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत जनजागृती केली जाणार आहे. त्यामुळे युवक व नवमतदारांसाठी ही संधी उपयुक्त ठरणार आहे.
पत्रकार परिषदेत अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या दारी शासनाच्या योजना पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू जनतेला, या महामेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांचा तसेच मोफत विधी सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Post a Comment