वाचनाने व्हावा स्थूलतेकडून सुक्ष्मतेकडे प्रवास- डॉ. महेश केळुस्कर ‘माझे वाचन आणि मीः’ या परिसंवादात मान्यवरांनी उलगडला आपला वाचनप्रवास



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- पुस्तक हे आपल्या आयुष्यात हातात हात घालून सोबत असतं. त्यामुळे सदैव पुस्तकांशी मैत्री असावी. प्रत्येकाची वाचनाची सुरुवात बालपण, विद्यार्थी दशेत होतांना वाचनाचा प्रवास हा स्थूलतेकडून सुक्ष्मतेकडे व्हावा आणि आपला आंतरिक विकास व्हावा,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर यांनी केले.
रायगड जिल्हा ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ‘माझे वाचन आणि मी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाचे अध्यक्ष  जेष्ठ साहित्यिक, तथा कोकण साहित्य मराठी परिषदेचे अध्यक्ष डॉ.महेश केळुसकर हे होते. या परिसंवादात  जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. फिरोज मुल्ला, सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय, अलिबागच्या कार्याध्यक्ष श्रीमती शैलाताई पाटील, जेष्ठ साहित्यिक व माजी आकाशवाणी केंद्र प्रमुख किशोर सोमण, या मान्यवरांनी आपला वाचन प्रवास उपस्थित वाचकांसमोर उलगडला.
आपले विचार मांडतांना जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. फिरोज मुल्ला म्हणाले की, हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं आणि मोबाईल हातात घेतला. तर वाचन होणार कसं? असा सवाल उपस्थित करुन डॉ. मुल्ला यांनी आपली स्वतःची वाचनाची भूक भागविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ते म्हणाले की वाचन म्हणजे जीवनाला होणारा परिसस्पर्श आहे. वाचनाने जीवनाचं सोनं होतं
जिल्हा ग्रंथालयाच्या कार्याध्यक्ष श्रीमती शैलाताई पाटील यांनी आपला वाचन प्रवास हा ‘श्यामची आई’ या साने गुरुजींच्या पुस्तकापासून खऱ्या अर्थानं सुरु झाला,असं सांगितलं. त्या म्हणाल्या की, वयोपरत्वे वाचनाची आवड बदलत गेली. परंतू वाचन झालं ते सर्वंकष झालं. टिळक, आगरकर, चिपळूणकर, गोखले आदींचे वाचन करता करता भाषा समृद्ध होत गेली. आणि अनेक पुस्तके ही जीवनावर परिणाम करणारी ठरली. केसरी पाटील यांचे पुस्तक वाचून मी स्वतः ट्रॅव्हल कंपनी सुरु केली. वाचन म्हणजे मित्र, गुरु, त्यामुळे आयुष्य समृद्ध झालं.
ज्येष्ठ साहित्यिक, माजी आकाशवाणी केंद्रप्रमुख किशोर सोमण म्हणाले की,जीवनातलं श्रेयस आणि प्रेयस  हे मला वाचनामुळे कळालं. ते म्हणाले की, बालपणी अक्षरांशी मैत्री होणे गरजेचे होय. वाचन करणं हा खरं म्हणजे एक प्रकारचा व्यायाम असतो. वाचन आपल्याला लिहिणं शिकवतं. वाचना सोबत श्रवण ही आवश्यक असतं. माणूस वाचणं हे ही एक प्रकारचं वाचनच. असं वाचलेलं मला आकाशवाणी वरील कार्यक्रमांच्या निमित्ताने बोलता आलं हे माझं भाग्यच. वाचन बोलल्यामुळे शब्दांमध्ये अर्थांचे झुंबर लपलेलेल असतात ते दिसतात.असेच अनेक कार्यक्रमांच्या निर्मितीमुळे झालेल्या वाचनाच्या आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या.
अध्यक्षीय समारोपात डॉ. केळूस्कर म्हणाले की, ग्रंथोत्सवाच्या आयोजनात त्या त्या जिल्ह्यातील ग्रंथालयांचा व साहित्य संस्थांचा सहभाग असावा, अशी सुचना करुन ते म्हणाले की,  सोशल मिडीयाला वाचन संस्कृतीवरील आक्रमण न मानता त्याचा वाचन संस्कृती संवर्धनासाठी अनुकूल वापर करावा,असे प्रतिपादन त्यांनी केले.  वाचनाचे महत्त्व सांगतांना ते म्हणाले की,  पुस्तक आपल्याला शिकवतात.  त्यांना उपदेशक वगैरे म्हणणे मान्य नसल्याचे सांगून ते म्हणाले की,  पुस्तकं हे आपल्या हातात हात घेऊन सोबत असतात. त्यामुळे भाषेची बंधनं न ठेवता वाचकांनी  भरपूर वाचन केले पाहिजे.  वाचनाचा प्रवास हा स्थूलतेकडून सुक्ष्मतेकडे व्हावा, अशी व्यक्त करीत ते म्हणाले की, सर्वच महान व्यक्ति या उत्तम वाचक होत्या. मोबाईल हे यंत्र आहे. ते आपल्या वापरासाठी आहे त्याच्या आहारी जाता कामा नये. त्यामुळे वाचनासाठी वेळ मिळत नाही हा बहाणा खोटा आहे. हल्लीच्या काळात टिव्ही , सोशल मिडियाचा बोलबाला असतांना आभास आणि वास्तव यातील फरक कळण्यासाठी  वाचन अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप डॉ. केळूस्कर यांच्या ‘झिनझिनाट’ या कवितेने झाला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा ग्रंथालय अधिकारी डी. बी. वळवी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी  ग्रंथ वाचन या चळवळीला बळ देणारे संजय बायदे, भालचंद्र वर्तक आणि अमोल नाले यांना सन्मानित करण्यात आले. या सत्राचे सूत्रसंचालन संतोष बोंद्रे यांनी  तर आभार प्रदर्शन अजित पवार यांनी केले.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन