गांधीजींशी मैत्री करा-विजय तांबे


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- महात्मा गांधीजींनी देशातल्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेविरुद्ध लढा उभारला,  स्वच्छता चळवळ ही गांधीजींनी उभारलेली जाती व्यवस्था निर्मूलनाची चळवळ होती, देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला  अहिंसा आणि सत्य ही देणगी त्यांनी  दिली, अशा गांधीजींना समजून घ्यायचे तर त्यांच्याशी मैत्री करायला हवी, असे आवाहन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत विजय तांबे यांनी आज येथे केले.
रायगड जिल्हा ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात ‘गांधी समजून घेतांना’ या विषयावर  ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत विजय तांबे, यांचे व्याख्यान झाले. महात्मा गांधीविषयी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडतांना तांबे म्हणाले की,  बालपणात सामान्य विद्यार्थी, सर्व चुका केलेला मुलगा, एक अयशस्वी वकील असे गांधीजी नंतर इतके महान झाले. थोडक्यात आपण मनाशी ठरवलं तर आपणही गांधीजींसारखे होऊ शकतो. शोषणाच्या पायावर उभ्या असलेल्या संस्कृति आणि सभ्यता यांच्यामुळे भारतातली ग्रामिण अर्थव्यवस्था उध्वस्त झाली. त्यासाठी ग्राम स्वराज्याच्या पुरस्कार केला. स्वच्छता व श्रम यांचा वापर करुन त्यांना जाती व्यवस्था नष्ट करावयाची होती. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करतांना त्यांनी देशातील सामाजिक आर्थिक विषमता विरोधी लढेही त्यांनी उभारले, अशा या गांधीजींना समजून घेण्यासाठी त्यांच्याशी मैत्री करा, असे आवाहन तांबे यांनी केले.
 या कार्यक्रमाच्या प्रारंभी विजय तांबे यांचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी यांनी  ग्रंथ देऊन स्वागत केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी  यांनी केले, तर  अजित पवार यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन