जिल्ह्यात 155 पैकी 56 जणांनी करोना विरुध्दची जिंकली लढाई तर रुग्णालयातील दाखल 95 जणांचीही प्रकृती उत्तम
अलिबाग, जि. रायगड, दि.6 (जिमाका) :- जिल्ह्यात
मुंबई, परराज्य आणि परदेशातून आलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या
काही व्यक्तींना करोनाची लागण झाली. जिल्ह्यात दाखल झालेल्यांपैकी 1 हजार 150
जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तपासणी अंती 966
नागरिकांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात 155 जणांना करोना लागण झाली असून आरोग्य
यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे 56 रुग्णांनी करोनाला हरवून माणसाची
जगण्याची जिद्द सिद्ध केली आहे. या 56 करोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून बरे होऊन
घरी पाठविण्यात आले आहे. दुर्देवाने 4 जणांचे जगण्याचे प्रयत्न असफल झाले.
जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका हद्दीत उपजिल्हा
रुग्णालय पनवेल-72 (उत्तम), सेव्हन हिल्स रुग्णालय, मुंबई-3 (उत्तम), रिलायन्स
रुग्णालय, नवी मुंबई-2 (उत्तम), एम.जी.एम.
रुग्णालय, कामोठे- 3 (उत्तम), हिंदू महासभा रुग्णालय- 2 (उत्तम), नायर रुग्णालय,
मुंबई-1 (उत्तम), बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई-1 (उत्तम), सिव्हिल हॉस्पिटल, ठाणे-1
(उत्तम), फोर्टिज हॉस्पिटल, नवी मुंबई- 2
(उत्तम), सायन रुग्णालय, मुंबई-2 (उत्तम), डी.वाय.पाटील रुग्णालय, नवी मुंबई- 3
(उत्तम), सेंट जॉर्ज रुग्णालय, मुंबई-2 (उत्तम), हिंदूजा रुग्णालय, मुंबई- 1
(उत्तम), अशा एकूण 95 करोना बाधित व्यक्तींचे विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु
आहेत आणि त्यांची प्रकृती उत्तम असून तेही लवकरच पूर्ण बरे होऊन आपआपल्या घरी
परततील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
याचा अर्थ करोनाचा प्रभाव कमी होत आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस
यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद यंत्रणा, प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि रायगडकर जनता या सर्वांच्या
एकजुटीतून जिल्ह्यात करोना विरुद्धची लढाई यशस्वी होईल, त्यामुळे नागरिकांनी बऱ्या
होणाऱ्या नागरिकांची संख्या पाहता शासकीय
यंत्रणेवर विश्वास ठेवावा, शासनाकडून ज्या सूचना देण्यात येत आहेत त्यांचे पालन
करावे, असे आवाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी,
जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी
केले आहे.
00000
Comments
Post a Comment