मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व बीज भांडवल कर्ज योजना १०० टक्के उद्दिष्टपूर्ती
रायगड-अलिबाग,दि.०२(जिमाका) :- सुशिक्षित बेरोजगार युवक/युवती यांना स्वता:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्याकरिता शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत सन २०२५-२६ करीता जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग या अंमलबजावणी यंत्रणेस ५७६ व खादी ग्रामोद्योग मंडळ रायगड-अलिबाग या अंमलबजावणी यंत्रणेस ३८४ असे ९६० चे भौतिक उद्दिष्ट होते. त्यानुषंगाने सन २०२५-२६ अंतर्गत जिल्ह्यातील विविध बँक शाखेकडे एकूण २ हजार ४२७ प्रस्ताव शिफारस करण्यात आले होते. या प्रकरणांपैकी एकूण ९६५ प्रकरणात बँक शाखेद्वारे मंजूरी असून उद्दिष्टांच्या १०० टक्के जास्त उद्दिष्टांची पूर्तता यावर्षी केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडून सूक्ष्म नियोजन करुन सलग दुसऱ्या वर्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग या अंमलबजावणी यंत्रणेस १४ व खादी ग्रामोद्योग मंडळ रायगड-अलिबाग या अंमलबजावणी यंत्रणेस १४ व खादी ग्रामोद्योग आयोग या अंमलबजावणी यंत्रणेस ०६ असे एकूण ३४ प्रस्तावांचे भौतिक उद्दिष्ट होते. त्यानुषंगाने सन २०२५-२६ अंतर्गत जिल्ह्यातील विविध बँक शाखेकडे एकूण १४६ प्रस्ताव शिफारस करण्यात आले होते. या प्रकरणापैकी एकूण ७० प्रकरणात बँक शाखेद्वारे मंजूरी असून उद्दिष्टांच्या १०० टक्के पेक्षा जास्त उद्दिष्टांची पूर्तता यावर्षी करण्यात आली आहे.
तसेच बीज भांडवल कर्ज योजना अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, रायगड करिता प्राप्त उद्दिष्टांची देखील १०० टक्के पूर्तता केली आहे.
यासाठी विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी किशन जावळे, उद्योग सहसंचालक, कोकण विभाग श्रीमती विजू सिरसाठ, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी तसेच सर्व बँक क्षेत्रीय अधिकारी, जिल्हा बँक समन्वयक यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या यांनी कळविले आहे.
०००००००
Comments
Post a Comment