शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी महाड नगर परिषद

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
दूरध्वनी -222019, ई मेल- dioraigad@gmail.com,                dioabg@rediffmail.com
फेसबुक :- dioraigad        ट्विटर :- @dioraigad
दिनांक 11 ऑगस्ट 2016                                                                                  लेख क्रमांक 20

शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी
महाड नगर परिषद





         छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यात   ऐतिहासिक, सामाजिक, नैसर्गिक वैशिष्टांनी नटलेल्या व  मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वसलेले महाड हे एक महत्वाचे शहर.   जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ असलेले महाड पूर्वीपासूनच प्रसिध्द. इतिहासाची महत्वपूर्ण साक्ष असलेल्या या महाड शहरातील नगर पालिकेची स्थापना दीडशे वर्षापूर्वी  म्हणजे 1866 साली झाली.   या दीडशे वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात नगर परिषदेत अनेक संक्रमणे झाली.  शहराच्या भौतिक विकासाबरोबरच नागरी सुविधा आणि शहराची सांस्कृतिक, सामाजिक जडणघडण  घडत गेली.
      सामाजिक समता लढयाचे साक्षीदार असलेल्या चवदार तळयाच्या महाड नगरीतील ही नगर परिषद 12 ऑगस्ट 2016 रोजी आपला शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करुन ऐतिहासिक ठरणार आहे. निश्चितच ही आनंददायी घटना पण नुकत्याच घडलेल्या  सावित्री नदीवरील पुल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आनंदोत्सव साजरा न करता, या दुर्घटनेतील मृताम्यांना श्रध्दाजंली वाहून महाड नगर परिषद सामाजिक बांधिलकी जपणार आहे.  

            महाराष्ट्राच्या इतिहासात महाडचे एक आगळे-वेगळे  वैशिष्टय. उपलब्ध माहितीनुसार 1882 मध्ये तत्कालीन कुलाबा नाव असलेल्या या जिल्ह्यामध्ये अलिबाग, पेण, रोहा व महाड हे चारच तालुके होते.  राजधानी मुंबई पासून 180 कि.मी.,पुण्यापासून 120 कि.मी. तर अलिबाग पासून 120 कि.मी.अंतरावर जिल्ह्यात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला महाड तालुका.   छत्रपतींची राजधानी रायगड किल्ला मोठया वैभवाने आपल्या हदयात कोंदणातील हिऱ्याप्रमाणे महाडने जतन करुन ठेवला आहे.   पूर्वेला पुणे जिल्हा, पश्चिमेला श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दक्षिणेला पोलादपूर तर उत्तरेला माणगाव अशी  महाड शहराची रचना.   
इवलेसे रोप
            1866 साली महाड नगर परिषदेची स्थापना झाली. एका छोटयाशा इमारतीत सुरु झालेल्या  नगर परिषदेचा कारभार  विस्तारला गेला आणि 1939 साली तत्कालीन भव्य-दिव्य अशा वास्तूत नगर परिषदेचे स्थलांतरण झाले.   या इमारतीला हा जवळपास 77 वर्ष झाली असल्याने यापेक्षाही अधिक भव्य-दिव्य अशी नगर परिषदेची नुतन वास्तू निर्माण करण्याचे  योजले असून या इमारतीचा आराखडा मंजूर झालेला आहे. 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 41 हजार 236 यात पुरुष 21 हजार 244 तर महिला 19 हजार 292 आहेत.   नगर परिषदेस 2 ऑक्टोबर 2015 रोजी हागणदारीमुक्त झाल्याबद्दल राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.  तसेच जिल्हा नियोजनाच्याद्वारे नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून महाड चवदार तळयातील पाण्याचे बायो सॅनिटायझेशनद्वारे  शुध्दीकरण करुन  पाण्यातील दुर्गंधी व शेवाळ दूर करण्यात आले आहे. क वर्ग असणाऱ्या या नगर पालिकेने भविष्याचा विचार करुन 1960 साली स्वत:च्या मालकीचे कुर्ले धरण बांधले.  तसेच टप्प्या टप्प्याने  विविध विकास कामे हाती घेतली.  त्यातूनच नगर परिषदेच्या दूरदृष्टीची साक्ष पटते.
विभूतींचे योगदान
                       भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श या वास्तूला झाला आणि खऱ्या अर्थाने वास्तू धन्य झाली.  महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र देण्याचा बहुमान देखील महाड नगर परिषदेला मिळाला आहे.  क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित, दलितमित्र सुरबानांना टिपणीस, काळकर्ते शि.म.परांजपे, नटवर्य पुंडलिक वर्णेकर, कोकण साहित्य भूषण दादासाहेब सावंत, 1942 च्या लढयातील सेनानी वसंत दाते  तसेच कमलाकर दांडेकर, अर्जुन भोई, नथू टेकावला, विठ्ठल बिरवाडकर, रमेश कडू हे सारे हुतात्मे याच पवित्र भुमीचे.   या भूमीला अधिक गौरवशाली करण्यास अनेक विभूतींनी  योगदान दिले, आणि महाडच्या वैभवात भर टाकली.  अनेक मातब्बर मंडळी नगर परिषदेचा कारभार पाहू लागली. पाहता पाहता हा कारभार कोटयावधीत पोहचला.
नगराध्यक्ष महमद अली पल्लवकर
                         शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असतानाच अनेक आव्हाने झेलत आपणास पुढचा प्रवास करायचा आहे.  रायगडच्या कुशीत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या  पदस्पर्शाने पावन झालेल्या या शहरात संपूर्ण जगताला सामाजिक समतेचा संदेश देणारा चवदार तळयाचा सत्याग्रह आम्हास फार मोठी प्रेरणा देवून जातो.   नगर परिषदेच्या वाटचालीत केंद्रातील व राज्यातील सर्व आजी, माजी मंत्री तसेच खासदार व आमदार यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले आहे  असे नगराध्यक्ष सांगतात .
                       महाडच्या परिवर्तनाचे शिल्पकार स्वर्गीय अण्णासाहेब सावंत यासारख्या अनेकांनी या नगर परिषदेच्या वाटचालीत मोलाचे योगदान दिले आहे.  या सर्वांच्या कार्य कर्तृत्वाला मानाचा मुजरा करुनच महाड नगर परिषद भविष्याची वाटचाल करीत असल्याचे नगराध्यक्ष पल्लवकर म्हणतात.  परिवर्तनाचे ध्येय समोर ठेवून विद्यमान नगराध्यक्ष  महमदअल्ली पल्लवकर  तसेच सर्वजण विद्यमान पदाधिकारी  विविध लोकाभिमुख उपक्रम राबवित आहेत. त्यास मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप  व त्यांचा सहकारी कर्मचारी वर्ग  साथ देत आहे. 
             एखाद्या वास्तूचा व संस्थेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव होणे ही बाब त्या संस्थेच्या यशस्वी कार्याची मोठी पावतीच असते.  1866 पासून  1947 पर्यंत 81 वर्ष पारतंत्र्याचा काळ व त्यापुढील  69 वर्षे  स्वातंत्र्याचा काळ अशी दीडशे वर्ष महाड नगर परिषद नगरातील लोकांना अखंड सेवा देत आहे, देत राहील.     महाड नगर परिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा !
000000
डॉ.राजू पाटोदकर
जिल्हा माहिती अधिकारी
रायगड-अलिबाग

(patodkar@yahoo.coin)

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक