महाड दुर्घटना आणखी दोन मृतदेह सापडले दोन बस व तवेरा शोधण्यास संयुक्त शोध पथकास यश

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
      दिनांक :- 14 ऑगस्ट, 2016                                                        वृत्त क्र. 529
महाड दुर्घटना
आणखी दोन मृतदेह सापडले
दोन बस व तवेरा शोधण्यास संयुक्त शोध पथकास यश


            अलिबाग दि.14 :- महाड येथील सावित्री नदीवरील पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्ती व वाहनांचा शोध घेणाऱ्या संयुक्त शोध  पथकास  एम.एच.40, एन.9739 राजापूर-बोरीवली,एम.एच.20-1538 जयगड-मुंबई या दोन बस  व एम.एच.04 जीडी 7837 तवेरा गाडीचा  शोध लावण्यास  यश मिळाले आहे.  तसेच तवेरा गाडीमध्ये आणखी दोन पुरुष मृतदेह आढळून आहे.  या दोन मृतदेहासह एकूण 28 मृतदेह संयुक्त शोध पथकास सापडले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले व जिल्हा पोलीस अधिक्षक मो.सुवेज हक  यांच्या मार्गदर्शनात अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी शोध व मदत पथकाचे नियंत्रण केले.
शोध कार्यासाठी एनडीआरएफची पथके, नौदल, हवाई दल, स्थानिक पोलीस यांनी  300 किलो वजनाचे लोहचुंबक, बोटी, राफटींग, स्कूबा डायव्हिंग, स्थानिक मच्छीमार, के.एम.बी. कम्युनिकेशनच्या   9 बोटी, 8 डायव्हर्सद्वारे, 5 राफ्टरर्स, 6 केकेज् टीम, नौदल पाणबुडयांचे विशेष प्रशिक्षित पथक, सोनार यंत्रणासह स्थानिकांच्या मदतीने प्रयत्न केले.  
मदत केंद्र
जिल्हा प्रशासनाच्या वतीने महाड दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्ती, वाहने शोधण्याससाठी महाड येथे तात्पुरते मदत केंद्र उभारण्यात आले होते.  या शोध व मदत कार्यावर उपविभागीय अधिकारी श्रीमती सुषमा सातपुते व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रांजली सोनवणे, तहसिलदार संदिप कदम यांनी या मदत केंद्रामार्फत बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांना मदत व माहिती दिली.  तसेच सापडलेल्या मृतदेहाचे कायदेशीर कार्यवाही करुन मृतदेह संबंधितांच्या गावापर्यंत पाठविण्यात आले.   अलिबाग येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले होते.  त्याठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी सतिश बागल हे नियंत्रण करीत होते.
महाड व अलिबाग येथील नियंत्रण कक्षात नोंद झालेली बेपत्ता वाहने सापडली असल्याने  तसेच यापुढे आता पाण्यात मृतदेह सापडण्याची शक्यता कमी असल्याने एनडीआरएफ व नौदलाने आपली तपास मोहिम थांबविली आहे.  मात्र स्थानिक महसूल व पोलीस प्रशासन व गावपातळीवरील प्रशासनाच्या मदतीने बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याची मोहिम सुरुच राहणार आहे. या संदर्भात दुर्घटना स्थळ ते सावित्री नदी समुद्रास जेथे मिळते या परिसरातील नागरिकांनी त्यांना काही आढळून आल्यास प्रशासनास तात्काळ कळवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून तेथील टोल फ्री क्रमांक 1077 व  दूरध्वनी क्रमांक 02141-222118 असा आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक