प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्यास कटिबध्द होऊ या
लेख क्रमांक :-
55
दिनांक 26/10/2016
प्रदूषण
मुक्त दिवाळी साजरी
करण्यास
कटिबध्द होऊ या
दीपावली हा आनंदाचा,उत्साहाचा,अंधाराला
दूर सारुन प्रकाशाकडे नेणारा प्रकाशाचा सण आहे. लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वच हा
सण देशभर मोठया उत्साहाने साजरा करतात. आपण सर्वजणही हा सण साजरा करण्यासाठी सज्ज
झालो आहोत. हा सण साजरा करताना वायू, ध्वनी प्रदूषण मुक्त साजरा करण्याचे गरजेचे
आहे.
|
दीपावली म्हटलं की रोषणाई करुन आपले घर, अंगण, परिसर रोषनाईने
उजळून टाकले जाते. या सणा निमित्त घरी गोड -धोड फराळाचे पदार्थ करणे, नविन वस्तू खरेदी
करणे, नातेवाईकांना, मित्रमंडळीची आठवण ठेवणे आणि त्यांच्या सहवासात आनंदाचा हा सण
साजरा केला जातो. त्याचबरोबर फटाके फोडून मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करण्यात येतो.
अलिकडे तर विविध प्रकारचे रोषणाई देणारे तसेच मोठमोठे आवाजाचे फटाके फोडले जातात. फटक्यांच्या लांबच लांब माळा लावल्या जातात.
वास्तविक मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे प्रदूषणात वाढ होते. त्याचा परिणाम पर्यावरण
संतुलनावर होतो. त्याचबरोबर मानवी जीवनावर, भूतलावरील जीवसृष्टीवर त्याचा परिणाम होतो.
मोठ्या आवाजाच्या फटाक्यामुळे लहान मुलांना, वृद्ध लोकांना, रुग्णांना, विविध प्रकारच्या
परिक्षा देणाऱ्या विद्यार्थींना या मोठया फटाक्यांचा त्रास होऊन त्यांच्या दैनंदिन
जीवनात अडचण निर्माण होते. ऐवढेच नाही तर फटक्याच्या आवाजामुळे पशु पक्षी यांनाही त्रास
होतो. त्यांच्या जीवीताला धोका निर्माण होता. आपण पाहतो की प्रत्येक फटक्याच्या आवाजा
बरोबर अनेक पक्षी आकाशात उडत असतात.
फटक्याचा आवाज हा आपल्या श्रवणयंत्रणेच्या क्षमतेपेक्षा
कित्येक पटीत जास्त असतो. या आवाजामुळे काही वेळा तात्पुरते बहिरेपण येण्याची शक्यता
असते असे तज्ञ डॉक्टरांचे मत आहे. फटाक्यांमुळे आग लागण्याचे प्रकारही काही वेळा घडतात. तसेच अनावधानाने भाजण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे
दिवाळी सण साजरा करताना माणसाला काही वेळा वेदना देणाऱ्या घटना घडतात. फटाक्यांमुळे
हवेत कार्बनडाय ऑक्साईड, कार्बन मोनाक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड,
मॅग्नेशियम ट्राय ऑक्साईड असे घातक विषारी रसायने बाहेर येतात. त्यामुळे फुफ्फुसाचा,
श्वसनाचा कर्करोग होण्याची शक्यता, दमा, खोकला, रक्तदाब वाढणे असेही आजार होऊ शकतात. त्याचबरोबर पृथ्वीच्या तापमानातही वाढ होते. या सर्व बाबी पाहता फटाके मोठ्या प्रमाणात फोडणे
आरोग्याला घातक आहे.
वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण नियंत्रणात राखण्यात
जंगलाचा मोठा वाटा आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर जंगलतोड किंवा भूपृष्ठावरील वनाचे प्रमाण
कमी होत असल्याने कार्बनडाय ऑक्साईडचे योग्य प्रकारे नियंत्रण राखले जात नाही. त्यामुळे तापमाण वाढीत त्याचा परिणाम होतो. तापमाण वाढीमुळे पृथ्वीभोवती असलेल्या ओझोनचा थर
कमी होऊ लागला आहे. त्यामुळे ही जीवसृष्टीवर
परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यास विशेष महत्व आहे. ओझोन
थरामुळे सूर्यापासून येणारी उष्णता अडवली जाते.
सूर्याच्या उष्णतेपैकी केवळ 50 टक्के
म्हणजे निम्मीच उष्णता पृथ्वीवर या थरामुळे येते. हा थर कमी झाल्यास मोठ्या प्रमाणात
सूर्याची उष्णता पृथ्वीवर येऊन त्याचा गंभीर परिणाम संपूर्ण भूपृष्ठावर होण्याची शक्यता
आहे. या सर्वांपासून बचावाचे काम ओझोनचा थर करीत असल्यामुळे त्याला पृथ्वीची कवचकुंडलेही
म्हटले जाते. आणि ती शाबुत ठेवण्यासाठी प्रदूषण रोखण्याचे काम जाणीवपूर्वक प्रत्येकाने
करणे आवश्यक आहे. ध्वनी, वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण
नियंत्रण मंडळामार्फत केले जाते. फटाके फोडल्यामुळे
मोठया प्रमाणात होणारे ध्वनीप्रदूषण नियंत्रणात ठेवण्याबाबत सर्वेाच्च न्यायालयाचेही आदेश आहेत.
दिवाळी सण साजरा करताना या बाबी लक्षात घेऊन फटाके फोडण्याएैवजी
आपल्या आप्तस्वकीयांना विविध प्रकारच्या भेटी देऊन, आकर्षक रोषणाही करुन, पुस्तके भेट देण्याच्या प्रथेचा अवलंब करुन नविन
पायंडा पाडुन फटाकेमुक्त आणि प्रदूषण न करता दिवाळी सण साजरा करण्यासाठी प्रत्येकाने
स्वत:च ठरविले पाहिजे. असे केले तर या सणाचा
आनंद द्विगुणीत होईल व पर्यावरणाचे संरक्षण होऊन दिपावली आरोग्यदायी होईल. चला तर प्रदूषण
मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी सर्वजण कटिबध्द होऊ या.
विष्णू
काकडे
माहिती
अधिकारी
जिल्हा
माहिती कार्यालय,
रायगड-अलिबाग
0000
Comments
Post a Comment