कुपोषण समस्या सोडविण्यास पंच्याहत्तर लाखांचा विशेष निधी - जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

दिनांक :- 06/10/2016                                                                                                       वृ.क्र.654
कुपोषण समस्या सोडविण्यास
पंच्याहत्तर लाखांचा विशेष निधी
                                                               - जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले


अलिबाग दि.6(जिमाका), जिल्हयात असलेल्या आदिवासींच्या कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून आदिवासी उपयोजनांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून 25 लाख रुपयांचा तर आदिवासी उपयोजना 50 लाख रुपये असा एकूण 75 लाखाचा निधी पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या मान्यतेने तातडीने उपलब्ध करुन देण्यात आला असून  जिल्हा प्रशासन गांर्भीयाने हा विषय हाताळत असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी  दिली.
या नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत ग्राम बाल विकास केंद्र (VCDC) आणि बाल उपचार केंद्र (CTC) च्या माध्यमातून कुपोषित बालकांच्या उपचारासाठी निधी देण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी 21 दिवस सॅम (तीव्र कुपोषित) आणि मॅम (कुपोषित) बालकांना दाखल करण्यात येईल. त्यांच्यावर योग्य उपचार केले जातील. जिल्हा परिषद यंत्रणा तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्फत ही योजना राबविली जाईल. यात VCDC अंतर्गत 1200 रुपये प्रति बालक प्रति महिना तर CTC अंतर्गत 5250 प्रति बालक प्रति महिना खर्च होणार आहे. जिल्हयात सध्या सॅमची 241 तर मॅमची 958 कुपोषित बालके आहेत.
त्याच प्रमाणे आदिवासी विकास योजने अंतर्गत भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत 25 लाख तर अनुसूचित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी अंडी व केळी वाटप यासाठी 25 लाख असा एकूण 50 लाख रुपयांचा निधी या विभागासाठी देण्यात आला. त्यामुळे कुपोषणाचा प्रश्न दूर होण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना
या योजनेअंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील लाभार्थीं गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिन्याच्या कालावधीत चौरस आहार देण्यात येईल.  एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी क्षेत्रातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये चपाती अथवा भाकरी, भात, कडधान्ये-डाळ, सोया दुध (साखरेसह), शेंगदाणा लाडू (साखरेसह), अंडी अथवा केळी अथवा नाचणी हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गुळ अथवा साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला इत्यादींचा समावेश असेल.  
अमृत आहार योजना कर्जत तालुक्यात सुरु असून यात एकूण 135 अंगणवाडी व मिनी अंगणवाडी  आहेत.  तर 460 गरोदर महिला, 517 स्तनदा माता आणि  7 महिने ते 7 वर्षे 5214 बालके आहेत.  या सर्वांसाठी या योजनेचा होत आहे.  एकंदरीतच जिल्हयात कुपोषण दूर करण्यासाठी प्रशासन सर्तकतेने व गांर्भीयतेने पाऊले उचलत असून केलेल्या उपाय योजनांचा सकारात्मक परिणाम येत्या काही दिवसात निश्चितपणे दिसून येईल. असेही त्यांनी सांगितले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक