दैनंदिन व्यवहारात नागरिकांनी कॅशलेस पध्दतीचा अवलंब करावा ---------------------------- सुरुवातीला किमान 25 गावे कॅशलेस करण्याचा निर्धार ----जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

दिनांक:- 6/12/2016                                                                                                वृत्त क्र. 778
दैनंदिन व्यवहारात नागरिकांनी
कॅशलेस पध्दतीचा अवलंब करावा
----------------------------
 सुरुवातीला किमान 25 गावे कॅशलेस करण्याचा निर्धार
                                                                            ----जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

अलिबाग दि.6 :- (जिमाका)  देशात 500  आणि रु.1000 रुपयांच्या निश्चलीकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला  आहे.  आर्थिक व्यवहार कॅशलेस करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे.  या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार कॅशलेस  करावे.  या कामात जिल्ह्यातील बँकानी पुढाकार घ्यावा सुरुवातीला  जिल्ह्यातील किमान 25 गावे कॅशलेस करण्याचा निर्धार असून यासाठी बँकांनी योग्य नियोजन करावे अशा सूचना  जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे दिल्या.
जिल्ह्यात कॅशलेस आर्थिक व्यवहारांना चालना मिळावी.   कॅशलेस व्यवहार करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना करण्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.   या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, रिझर्व्ह बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर बी.एच.मेश्राम,  लिड बँकेचे व्यवस्थापक टी.मधुसूदन, जिल्हा पुरवठा अधिकारी लिलाधर दुफारे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण राजेंद्र मदने, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल अनंत पाटील, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर तसेच जिल्ह्यातील बँकाचे प्रतिनिधी,विविध विभागाचे वरिष्ठ शासकीय अधिकारी, मच्छिमार सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, स्वत धान्य दुकानदार संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.  
जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या की, कॅशलेस व्यवहार वाढविण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे.  नोटा बंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस पध्दतीचा अवलंब करण्याचे धोरण आहे.  यासाठी इलेक्ट्रॉनिक सिस्टीमचा वापर करणे अनिवार्य ठरले आहे. डेबिट कार्ड,इंटरनेट बँकींग,वायलेट,मोबाईल पेमेंट या  पध्दतीचा वापर करावा.  शासकीय विभागाची देणी, दंड इत्यादीचा भरणार इलेक्ट्रॉनिक सिस्टीमच्या माध्यमातून व्हावा.     साक्षर आणि निरक्षर अशा दोन्ही लोकांना आपले आर्थिक व्यवहार कॅशलेस करता यावे यासाठी बँकांनी नियोजन करावे.  आवश्यक ठिकाणी प्रशिक्षणाची व्यवस्था करावी.  प्रत्येक नागरिकांचे बँक खाते उघडणे आवश्यक आहे त्यासाठीही प्रयत्न करावेत.  बँकांनी संस्थांना तसेच व्यापारी,दुकानदार यांना कार्ड स्वाईप मशिन उपलब्ध करुन द्यावेत.  तसेच नागरिकांनी पाच डिजिटल पध्दतीचा वापर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
डिजिटल लाईज पध्दतीचे पाच मार्ग
1)यूपीआय :  या पध्दतीत आपला मोबाईल क्रमांक बँक अथवा एटीएम  मध्ये नोंदवा.   संबंधित बँकेचे ॲप डाऊनलोड करा.  आपला आयडी तयार करा.  आपला पिन  नंबर सेट करा.  यानंतर आपण कोठूनही आपली आर्थिक देवाणघेवाण करु शकतात.    2)युएसएसडी :  आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करा.  आपल्या फोन वरुन *99# डायल करा.  आपल्या बँकेचे नाव भरा (फक्त पहिली तीन आद्याक्षरे) किंवा आयएफएससी कोडची पहिली चार अक्षरे , फंड ट्रान्स्फर-MMID  हा ऑप्शन निवडा.  ज्यांच्याशी व्यवहार करावयाचा आहे त्यांचा  मोबाईल नंबर आणि MMID  टाका, द्यावयाची रक्कम आणि MPIN स्पेस आणि खाते नंबरचे शेवटचे चार अंक भरा.  यानंतर आपण आर्थिक  देवाणघेवाण  करु शकतात.     3)ई वॅलेट : एसबीआय बडी प्रमाणे वॅलेट डाऊन लोड करा.  आपला मोबाईल नंबर रजिस्टर करा.  त्याला आपल्या डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिगशी लिंक करा. आता तुमचा फोन  हेच तुमचे  वॅलेट अर्थात पैशाचे पाकीट झाले आहे.    4)कार्डस : आपली आर्थिक देयके आपल्या प्रिपेड, क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे करा.  आपले कार्ड स्वाईप करा. आपला पिन नंबर टाका,पावती घ्या.   5) आधार संलग्न पेमेंट पध्दती : आपले आधार कार्ड  हे आपल्या बँक खात्याशी संलग्न करा.  आपण आपली देवाणघेवाण खात्यावरील शिलकेची चौकशी,पैसे जमा करणे,काढणे,एका खात्यातून दुसऱ्या खात्यावर पाठविणे हे सर्व व्यवहार करु शकता. याबाबतची माहिती जिल्ह्याच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
  जिल्ह्यातील 25 बँकांनी सुरुवातीला किमान प्रत्येकी एक गाव याप्रमाणे अशी 25 गावे  कॅशलेस  करावी.  यासाठी संबंधित गावात आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.  या कामासाठी संबंधित  ग्रामपंचायतीचे सहकार्य घ्यावे. संबधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांनी या कामात  मदत करावी अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 
लिड बँकेचे व्यवस्थापक टी.मधुसूदन यांनी सादरीकरणाद्वारे डिजिटल लाईज पध्दतीचे पाच मार्गाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

                                                                         00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक