स्मारक शिवछत्रपतींचे महाराष्ट्राच्या अस्मितेचे

दिनांक :-  22 डिसेंबर 2016                                                 लेख क्र-64
स्मारक शिवछत्रपतींचे
महाराष्ट्राच्या अस्मितेचे


               छत्रपती शिवराय महाराष्ट्रातील प्रत्येकाचे आराध्य दैवत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक.  त्यांचे मुंबई अरबी समुद्रात होत असलेले आंतरराष्ट्रीय स्वरुपाचे स्मारक म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेची आणि महाराष्ट्राची अस्मिता होय.
             मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते या स्मारकाच्या भुमिपुजन व जलपुजनाचा समारंभ शनिवार दि.24 डिसेंबर 2016 रोजी दुपारी 3 वाजता संपन्न होत आहे. त्या निमित्ताने हा लेख..
             राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबई लगत अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय 2002 मध्ये घेतला.   मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने याबाबत कार्यवाही करुन्‍ स्मारकाच्या कामास गती दिली.  अरबी समुद्रातील जागा निश्चित करुन ज्या जागेवर  स्मारक उभारणीस  28 फेब्रुवारी 2014 ला मान्यता दिली..
            राजभवनापासून जवळच असणाऱ्या समुद्रातील  बेटावर जगातील सर्वात उंच असे हे स्मारक असेल. हा कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरावा यासाठी राज्यातील सुमारे 70 हून अधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्ल्यांवरची पवित्र माती या ठिकाणी आणली जाणार आहे.
            या स्मारकास राज्य व केंद्र शासनासह महापालिकेच्या विविध विभागाच्या परवानग्या आवश्यक होत्या. यामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, नौदल पश्चिम विभाग, तटरक्षक दल, सागरी किनारा अधिनियम,मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका, बेस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट, बी.एन.एच.एस.इंडिया,मत्स्यव्यवसाय विभाग,राष्ट्रीय सुरक्षा दल, दिल्ली, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण अशा बारा विभागांची  ना हरकत प्रमाणपत्रे शासनास प्राप्त झाली आहेत.
जगातील सर्वात उंच स्मारक
            आपल्या असामान्य कामगिरीने महाराष्ट्राची पताका जगभरात फडकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या वतीने हे अनोखे वंदन असेल. महाराष्ट्राच्या तेजस्वी आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब या स्मारकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.  त्यामुळे प्रकल्पाचे अनोखे व विशिष्ट स्वरुप लक्षात घेऊन प्रकल्पाचा आराखडा, निविदा कागदपत्रे तयार करणे, प्रकल्पावर देखरेख करणे यासाठी दिनांक 11 एप्रिल 2016 रोजी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करून त्यानंतर प्रकल्प आराखडा मंजूर करण्यात आला आहे. 
            या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2300 कोटी रूपयांची  कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा, महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कला दालन, प्रदर्शन  गॅलरी, महाराजांच्या चरित्रावर आधारित पुस्तकांचे सुसज्ज वाचनालय, प्रेक्षक गॅलरी, उद्यान, हेलीपॅड, अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी व जनतेसाठी जेट्टी (धक्का), सुरक्षाविषयक व्यवस्थेचा समावेश आहे.              प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक निविदा मागविण्यात आल्या आहेत. येत्या तीन वर्षात स्मारक पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन असून ते भावी पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. महाराजांची जीवनमूल्ये प्रदर्शित करणारे देशभक्तीपर माहिती केंद्रही या स्मारकात असेल. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी पर्यटनस्थळ असणार आहे.

                                                         दर्याचा माझ्या दरारा मोठा

            उसळती शिवस्मृतींच्या डोंगर लाटा असे भव्य दिव्य स्मारक होणार आहे.  पूर्वी पासून असलेली क्विन्स नेकलेस अशी या भागाची ओळख त्यात आता स्मारकरुपी हिऱ्याची भर पडून ते महाराष्ट्राची अस्मिता ठरेल.  शिवछत्रपतींचा आशिर्वाद… आभाळा एवढया भव्यतेला सागराची साद असणारे हे स्मारक आहे. या स्मारकाच्या  रुपाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा नव्या पिढीला अनुभवता येणार आहे.  आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबई आणि महाराष्ट्राला नवी ओळख या निमित्ताने मिळेल यात शंका नाही. छत्रपतींचे हे स्मारक वास्तुकलेचा एक उत्तम नमुना असेल.
मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबरला होत आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी राज्यातील जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
0000000

डॉ.राजू पाटोदकर
जिल्हा माहिती अधिकारी
रायगड-अलिबाग

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक