रस्त्यांमुळे गाव समृध्द होईल ----राज्यमंत्री रविंद्र चव्हाण
रस्त्यांमुळे
गाव समृध्द होईल
----राज्यमंत्री रविंद्र चव्हाण
अलिबाग दि.21 :- (जिमाका) मुख्यमंत्री ग्रामसडक
योजनेतून तयार होणाऱ्या रस्त्यामुळे प्रत्येक गाव शहराला जोडले
जाऊन गावामध्ये समृध्दी येईल. या योजनेतून संपूर्ण जिल्ह्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या अंतर्गत रस्त्याची कामे करण्यासाठी
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे रस्ते बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती
तंत्रज्ञान, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
मुख्यमंत्री
ग्रामसडक योजनेतून पेण-बोरगाव ते विराणी धनगरमाळ या रस्त्याच्या कामाच्या भूमिपुजन
प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार
प्रशांत ठाकूर, आमदार धैर्यशील पाटील,
जि.प.माजी अध्यक्षा निलिमा पाटील, पेण प्रांताधिकारी श्रीमती पी.एस.जैतू,
तहसिलदार श्रीमती वंदना मकू आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना
श्री.चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रायगड
जिल्ह्यातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या माध्यमातून होणारे रस्ते तेथील गावातील
ग्रामस्थांनी आपला गाव,आपला रस्ता हे समजून रस्त्याचे होणारे काम चांगल्याप्रकारे
कसे होईल हे पाहणे गरजेचे आहे. केलेले
रस्त्याचे काम पाच वर्षापेक्षा जास्त टिकेल याचीही दक्षता घेतली पाहिजे. देश बदलत आहे हे सर्वसामान्य माणसाला सांगणे
गरजेचे नाही. आपल्या देशाला मा.पंतप्रधान
नरेंद्र मोदींच्या रुपाने एक चांगले व्यक्तीमत्व मिळाले आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी मिळणारा
निधी यात येणाऱ्या अडचणी मा.मुख्यमंत्री महोदयांनी सोडविल्या आहेत. गावातील महत्वाचे रस्ते झाले पाहिजेत यासाठी
राज्य शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास
विविध विभागाचे शासकीय अधिकारी तसेच
बोरगावातील नागरिक उपस्थित होते.
00000000
Comments
Post a Comment