उष्माघात ? काय करावे ?

लेख क्र.11                                                                                                   दिनांक :- 7 मार्च 2017
उष्माघात ? काय करावे ?
उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी काही  उपाययोजना आवश्यक आहे. त्यामुळे निश्चितच फायदा होऊ शकतो. यासाठी काय करावे व काय करु नये या बाबींकडे थोडे लक्ष द्यावे आणि आपले आरोग्य सांभाळावे.

आपल्या आरोग्याची काळजी  घेणे आपल्याच हाती असते. केवळ आपलेच कुटूंबिय नव्हे तर आपले हितसंबंधी आणि पर्यायाने संपूर्ण समाज्याची  जबाबदारी   कळत नकळत आपल्यावर येते.   तेंव्हा थोडी काळजी  घेणे गरजेचे आहे.
काय करावे
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे हे सांगतांना अगदी साध्या बाबी सांगितल्या आहेत. यात  तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. तसेच हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत.बाहेर जाताना गॉगल्स्, छत्री,टोपी, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा. त्याचप्रमाणे प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. आपण जर उन्हात काम करीत असाल तर  डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपडयांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे.हलगर्जीपणा करु नये.
 वैयक्तिक कार्यवाही सोबतच घरातही तसेच वातावरण हवे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघडया ठेवण्यात याव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. पहाटेच्यावेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये थोडे धावून नियमित आराम करावा. गरोदर स्त्रिया,कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरीता शेड उभारावेत, जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी. तसेच गुरांना छावणीत ठेवावे. त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे.
काय करु नये
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये.दुपारी 12.00 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावित, दुपारी 12.00 ते 3.30 या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.
          अगदी साध्या आणि सोप्या उपाययोजनांद्वारे आपण उष्माघातापासून आपले संरक्षण करु शकतो.  चला तर मग काळजी घेऊ,उष्माघातापासून संरक्षण करु
                                                                   संकलन
जिल्हा माहिती कार्यालय
                                                                                           रायगड-अलिबाग
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक