रायगड किल्ला परिसरात श्रमदान हे आत्मिक समाधान देणारे कार्य - कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख
रायगड किल्ला परिसरात श्रमदान
हे आत्मिक समाधान देणारे कार्य
- कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख
अलिबाग दि.29, (जिमाका)- रायगड किल्ला परिसरात करण्यात येणारे श्रमदान हे आत्मिक समाधान देणारे कार्य आहे. असे प्रतिपादन कोकण विभाग महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी काल रायगड किल्ल्यावर केले. त्यांनी रायगड किल्ल्यावरील परिसरात विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच महसूल व इतर विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने श्रमदान केले.
छत्रपती शिवरायांची राजधानी असलेला रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील महत्वाचा किल्ला असून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी ही आपली आहे. शासन त्यासाठी कार्य करीतच आहे. असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
गतवर्षी 2 कोटी वृक्षलावगड मोहिमेअंतर्गत रायगड किल्ल्यावर वृक्षलागवडीचा विशेष उपक्रम आयुक्त महोदयांनी राबविला होता. तसेच रायगड किल्ला संवर्धनासाठी शासनामार्फत विशेष निधीद्वारे महत्वपूर्ण असे कार्य त्यांच्या मार्गदर्शनात होत आहे. त्या कामाचीही त्यांनी पाहणी करुन आढावा घेतला. तसेच कुशावर्त तलावातील गाळ काढण्याच्या कामी श्रमदान केले. डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत जवळपास 250 श्री सदस्य आज तेथे श्रमदान करीत आहेत. रायगड किल्ल्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एक दिवस देऊन श्रमदान केल्याबद्दल आयुक्तांनी रायगड जिल्हयातील महसूल कर्मचारी, इतर विभागाचे शासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था यांचे अभिनंदन केले. तसेच अन्य मंडळींनी देखील या कामी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
आयुक्तांच्या समवेत महाड प्रांत सुषमा सातपुते, महाडचे प्रभारी तहसिलदार सचिन गोसावी, श्रीवर्धन व पोलादपूर तहसिलदार तसेच महसूल मंडळ अधिकारी व तलाठी तसेच कोतवाल पुरातत्व खात्याचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी तसेच स्वयंसेवक यांनी श्रमदान मोहिमेत सहभाग घेतला होता.
0000000
Comments
Post a Comment