भात लावणी 84 टक्के पूर्ण
अलिबाग,दि.3 (जिमाका)- जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे
भात लावणीला वेग आला असून आज अखेर भात लागवडी खालील एकूण क्षेत्रापैकी 84 टक्के क्षेत्रावर
भात लावणी पूर्ण झाली आहे.
जिल्ह्यात दिलासादायक पर्जन्यमान झाले आहे. आज अखेर
जिल्ह्यात एकूण सरासरी 2181.05 मि.मि. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाच्या 69.40 टक्के पर्जन्यमान
आतापावेतो नोंदविण्यात आले आहे.
यामुळे खरिपाच्या पेरण्यांच्या कामांना वेग आला आहे.
या संदर्भात कृषि विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण 1 लाख 42 हजार
64 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भात पिकाची
लागवड सर्वाधिक म्हणजे 1 लाख 23 हजार 730 हेक्टर क्षेत्रावर नियोजित आहे. त्यापैकी
आज अखेर भात पिकाची 1 लाख 4 हजार 44 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. एकूण भात लागवडीच्या 84 टक्के लावणी पूर्ण झाली आहे. सर्वाधिक
भात लावणी मुरुड, माणगांव, म्हसळा या तालुक्यात 100 टक्के पूर्ण झाली आहे.
जिल्ह्यात खरीप पिकांत नागली, वरई, अन्य तृणधान्य
पिकांची तसेच कडधान्य पिकांची लागवड होत असते. या पेरण्यांनाही वेग आला आहे. एकूण खरीपाच्या
लागवड क्षेत्रापैकी 1 लाख 12 हजार 322 हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झाला आहे. हे
प्रमाण 79 टक्के आहे.
Comments
Post a Comment