स्वच्छतेची मोहिम नियमित असावी --जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी
अलिबाग दि. 16 (जिमाका) :- निरोगी
आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची असून स्वच्छता
मोहिम केवळ अभियानपुरती मर्यादित न ठेवता नियमित असावी. यासाठी प्रत्येकाने
स्वच्छतेची सवय बाळगून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी
डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आज येथे केले.
निर्मल सागर तट स्वच्छता मोहिम
अंतर्गत, कोस्टगार्ड महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समुद्र किनारा
स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन
करताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, मेरीटाईम
बोर्डाचे प्रधान अधिकारी जसविर सिंग, कंमाडट कोस्टगार्ड अरुण कुमार सिंग आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी
म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानाद्वारे पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे. त्यानुसार आपण सातत्याने स्वच्छता मोहिम विविध ठिकाणी राबवितो. आज आपण अलिबाग समुद्र किनारा स्वच्छ करुन पर्यटकांना
त्याचे आकर्षण राहिल असे पहावे. या निर्मल
सागर तट स्वच्छता मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे स्वच्छ करण्याचे
काम आजपासून सुरु करण्यात आले आहे. आपला हा समुद्र किनारा आहे तो आपण नियमित स्वच्छ ठेवला तर
येथे येणाऱ्या पर्यटकालाही आनंद मिळेल. ज्येष्ठ
नागरिक संघटनाही या कार्यक्रमात सहभागी झाल्या त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो.
या स्वच्छता मोहिमेत जे.एस.एम.महाविद्यालयाचे
विद्यार्थी, केळूस्कर विद्यालयाचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघटना, एन.सी.सी.चे
विद्यार्थी यांनी स्वत: स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
00000
Comments
Post a Comment