स्वच्छता हीच सेवा:किल्ले रायगडावर स्वच्छता अभियान स्वच्छता राखून जपा पावित्र्य- जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी
अलिबाग,जि. रायगड, दि.१-रायगड किल्ल्यावर येणाऱ्या सर्व पर्यटकांनी किल्ल्यावर स्वच्छता राखून किल्ल्याचे पावित्र्य राखले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केले."स्वच्छता हीच सेवा" या उपक्रमातंर्गत रायगड किल्ल्यावर आयोजित स्वच्छता अभियानाप्रसंगी ते बोलत होते. या अभियानाची सुरवात किल्ल्यावरील होळीचा माळ येथून झाली.
यावेळी महाड प्रांत विठ्ठल इनामदार,महाड तहसीलदार चंद्रसेन पवार,पोलादपूर तहसीलदार शिवाजी जाधव,रायगड विकास आराखड्याचे सल्लागार राहुल समेळ,महाड नगर परिषदेचे सॅनिटरी इन्स्पेक्टर किशोर शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या वास्तव्याने पवित्र झालेला हा किल्ला स्वच्छ आणि पवित्र राखणे आपले कर्तव्य आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाने आपल्या नजरेस पडेल तो कचरा गोळा करावा जेणेकरून किल्ला स्वच्छ राहील. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटक येथील स्वच्छतेचा आदर्श आपल्या सोबत घेऊन जातील. गडावर येणाऱ्या पर्यटकांनी आपल्या सोबतच्या पाणी पिण्याच्या बाटल्या सोबतच घेऊन जाव्यात जेणेकरून कचरा होणार नाही. समोर दिसणारा कचरा कचरा कुंडीत टाकावा ,प्लास्टिकचा वापर टाळावा इतराना ही याबाबत सूचित करावे, असे आवाहन डॉ. सूर्यवंशी यांनी केले.
या स्वच्छता अभियानात पंचायत समिती,तहसील कार्यालय महाड व पोलादपूर,न.प.महाडचे अधिकारी- कर्मचारी,आय.टी. आय. महाडचे विद्यार्थी,लायन्स क्लब,रोटरी क्लबचे प्रतिनिधी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे विद्यार्थी, कॅ. एस.मोरे कॉलेजचे विद्यार्थी,स्वयंसेवी सस्थांचे प्रतिनिधी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
Comments
Post a Comment