आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी 'मिशन कायापालट' :आरोग्यकेंद्रनिहाय कृति आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:- जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या बळकटीकरणाकरीता 'मिशन
कायापालट' राबविण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सज्ज व्हावे. प्रत्येक
आरोग्य केंद्र हे 'माझा दवाखाना' या
विचाराने सुसज्ज करावा. त्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या
आरोग्य केंद्रनिहाय कृति आराखडा तयार करावा, असे सुस्पष्ट निर्देश 'कायापालट मॅन' जिल्हाधिकारी डॉ. विजय
सूर्यवंशी यांनी (दि.15 रोजी) येथे दिले.
जिल्ह्यात मिशन कायापालट
राबविण्यासाठी आरोग्य यंत्रणेची पुर्वतयारी बैठक शुक्रवारी माळरान कृषि पर्यटन
केंद्र, राजमाळ येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय
सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, , जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर,
वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी एआरटी डॉ. पांडुरंग शिंदे ,
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. कोकरे, तालुका आरोग्य अधिकारी मुरुड डॉ.
चंद्रकांत जगताप, जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक नवनाथ लबडे, जिल्हा सहाय्यक लेख
रवींद्र कदम, जिल्हा सहाय्यक एम अँड इ रश्मी सुंकले, जिल्हा सहाय्यक कार्यक्रम संपदा
मळेकर, आधार ट्रस्ट प्रतिनिधी जागृती गुंजाळ, सीसीसी एआरटी प्रेम खंडागळे हे
उपस्थित होते.
तसेच जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी
हे कोल्हापुर जिल्ह्यात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना त्यांनी
तेथे कायापालट अभियान राबवून कोल्हापूर
जिल्ह्यातील आरोग्य सेवेचे बळकटीकरण केले होते.
त्यानंतर हे अभियान केंद्रात '
कायाकल्प' म्हणून आणि राज्यात ' कायापालट' म्हणून स्विकारण्यात आले. यासंदर्भात
राज्यशासनाने दि.३ सप्टेंबर २०१४ रोजी शासन निर्णय जारी करुन या अभियानाची
अंमलबजावणी राज्यात लागू केले आहे. हे अभियान प्रत्यक्ष राबविलेले कोल्हापुरचे
तत्कालिन जिल्हा आरोग्य अधिकारी व
विद्यमान आरोग्य उपसंचालक डॉ. रामजी
अडकेकर, कोल्हापुरच्या जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. उषादेवी
कुंभार, भेडसगाव ता. शाहुवाडी जि. कोल्हापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र माळी हे उपस्थित वैद्यकीय यंत्रणेस
मार्गदर्शन करण्यासाठी आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी
म्हणाले की, उपचारानंतर बऱ्या झालेल्या रुग्णाच्या दृष्टीने डॉक्टर हा देव
असतो. आपण ज्या गावात सेवा देत असतात त्या
गावाशी, गावातील लोकांशी डॉक्टरांचे एक नाते तयार होते. त्यामुळे येणारा प्रत्येक रुग्ण हा समाधानाने
घरी परत जावा हा हेतू ठेवून काम करणे हे
आपले सेवा देताना उद्दिष्ट असावे. केवळ सरकारी दवाखाना नव्हे तर आपला दवाखाना ही
भावना मनात रुजवून काम करावे. शासनाने
राज्यात लागू केलेले हे कायापालट अभियान आपल्या जिल्ह्यात राबवून आरोग्य सेवा
उत्तम करण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणांनी सज्ज व्हावे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक
आरोग्य केंद्रनिहाय येत्या ३१ डिसेंबर पर्यंत सुविधांचे मूल्यमापन करुन कृति आराखडा तयार
करावा,असे निर्देश डॉ. सूर्यवंशी यांनी दिले.
यावेळी
कोल्हापुरच्या कायापालट अभियानातील सहयोग्यांनी आपल्या अनुभवांचे कथन आणि या
अभियानाच्या तेथील अंमलबजावणीची कथा उपस्थितांना सादरीकरणाच्या माध्यमातून
सांगितली.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
सचिन साळुंखे यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. कोरे यांनी केले.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची
सद्यस्थिती
जिल्हा परिषद अंतर्गतः- ५२ प्राथमिक आरोग्य
केंद्र.,२८८ उपकेंद्र, ७ दवाखाने.
जिल्हा रुग्णालय अंतर्गतः- जिल्हा रुग्णालय १(२७०
खाटांचे) अलिबाग येथे.उपजिल्हा रुग्णालय ५- ( पैकी एक १०० खाटांचे, उर्वरित ४ ५०
खाटांचे),ग्रामीण रुग्णालये ९. शिवाय
माथेरान व खोपोली ही दोन न. पा. दवाखानेही याच यंत्रणेमार्फत चालविले जातात.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत दोन सिटी
स्कॅन मशिन्स आहेत. त्यातील एक अलिबाग जिल्हा रुग्णालयात व एक माणगाव येथे आहे.
तथापि माणगाव येथील यंत्र बंद असून अलिबाग येथील यंत्र कार्यरत आहे. सर्व ग्रामीण रुग्णालयात एक्स रे मशिन्स आहेत.
अलिबाग व महाड येथे सोनोग्राफी यंत्रही आहेत.
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे रक्तपेढी असून महाड, माणगाव येथे रक्त साठवणूक यंत्रणा आहे.
कर्जत, उरण आणि पेण येथे रक्तसाठवणूक यंत्रणा उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. जिल्ह्यात शासनाने खाजगी यंत्रणेमार्फत
रक्ततपासणी सुविधा सर्व शासकीय रुग्णालयात उपलब्ध करुन दिली आहे. याशिवाय
जिल्ह्यात आपत्तीच्या रुग्ण सेवेसाठी १०८ ही शासनाची विनामूल्य रुग्णवाहिका
सेवा उपलब्ध आहेत. अशा २२ रुग्णवाहिका
जिल्ह्यात कार्यरत आहेत.
कायापालट अंतर्गत अपेक्षित
बाबीः- ग्रामिण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अशा सर्व ठिकाणी
इमारतींची अंतर्गत व बाह्य स्वच्छता, रंगरंगोटी. रुग्णसेवेसाठी मार्गदर्शक कार्यपद्धतीचा
अवलंब व त्याचे तंतोतंत पालन, रुग्णालयापर्यंत दिशादर्शक फलक, लांबून रुग्णालय
ओळखू यावे यासाठी दर्शनी कमान , परिसर स्वच्छता, सुसज्ज औषधालये, बाह्य रुग्णांसाठी प्रतिक्षालये, पिण्याचे
शुद्ध पाणी, उद्यान सुविधा, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी सौजन्यपूर्ण वर्तन, आवश्यक उपकरणांची उपलब्धता, स्थानिक
लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांचे सहकार्य मिळविणे,उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व
निधी (वस्तु स्वरुपात) उपलब्ध करुन आवश्यक बाबींची पूर्तता करणे.
०००००
Comments
Post a Comment