30 व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचा समारोप नवी आव्हाने पेलण्यासाठी पोलिसांनी अधिक स्मार्ट होणे आवश्यक -राज्यपाल सी. विद्यासागर राव
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11:- सोशल मिडीयाच्या अनिर्बंध वापरामुळे सामाजिक सलोख्याला धोका होऊन निर्माण
होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी अधिक स्मार्ट होणे आवश्यक आहे. त्यासाठी
पोलिसांना सोशल मिडीयासंदर्भात अत्याधुनिक प्रशिक्षण देऊन अद्यावत करणे आवश्यक
आहे. तरच आपले राज्य सामाजिक सलोखा व शांतता अबाधित राखून प्रगतित पुन्हा अग्रेसर
राहिल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
राज्य पोलीस दलाच्या 30व्या क्रीडा स्पर्धांच्या
समारोपप्रसंगी विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यासाठी श्री. विद्यासागर येथे
उपस्थित होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
नवी
मुंबई येथील सिडको क्रीडा मैदानावर आयोजित कार्यक्रमास राज्याचे पोलीस महासंचालक
संजय बर्वे, अपर मुख्य सचिव गृह सुधीर श्रीवास्तव, अपर महासंचालक प्रज्ञा सरवदे,
विशेष पोलीस महानिरीक्षक अनुपकुमार सिंह, कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस
महानिरीक्षक नवल बजाज, नवी मुंबई पोलीस
आयुक्त हेमंत नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. विद्यासागर यांनी पोलीस दलाचे व खेळाडूंचे
अभिनंदन व कौतूक केले. तसेच या स्पर्धेत
महिला खेळाडूंच्या वाढत्या सहभागाबद्दलही समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, सोशल
मिडीयाने समाजापुढे काही प्रश्न निर्माण केले आहेत. त्यामुळे सामाजिक सलोखा
धोक्यात येऊ शकतो. अशा वेळी पोलिसांनी सोशल मिडीयाच्या गैरवापरावर प्रतिबंध
आणण्यासाठी ‘सायबर खबरे’ तयार करावेत आणि त्यामाध्यमातून सोशल मिडीयावर चाललेल्या
हालचालींवर नियंत्रण ठेवावे, जेणेकरुन समाजातील शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित
राखता येईल. त्यासाठी स्मार्ट पोलिसींगची आवश्यकता प्रतिपादित केली. तसेच महिला,
मुले आणि पर्यटकांसंदर्भातील गुन्ह्यांचा दर शून्यावर आणण्यासाठी पोलीस दलाने
विशेष प्रयत्न करावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
श्री. विद्यासागर म्हणाले की, पोलीस दलातील अधिकारी आणि
कर्मचारी यांच्या आरोग्य तक्रारी
नियंत्रणासाठी अत्याधुनिक जिम, योगासने यासोबतच विपश्यना सारख्या सत्रांत
पोलिसांना सहभागी करावे, असे त्यांनी सांगितले. आपले राज्य प्रगतीतअग्रेसर राखण्यात पोलीस दलाने राखलेली
उत्तम कायदा सुव्यवस्थेचे महत्त्वाचे योगदान असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त
केले.
यावेळी राज्यपाल
महोदयांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या
संघांना गौरविण्यात आले. प्रारंभी पोलीस दलाचे वाद्यवृंद, राज्य राखीव पोलीस दलाचे
पाईप बॅण्ड पथक, तारफा व ढोल वृत्य तसेच जाखडी
नृत्य सादर करण्यात आले. 100 मिटर धावणे
या स्पर्धेतील पुरुष व महिला गटाचे अंतिम सामने
यावेळी पार पडले. या स्पर्धात 13
संघ सहभागी झाले. प्रत्यक्ष 3076 खेळाडूंनी यास्पर्धात सहभाग दिला व 9 विक्रम
नोंदविण्यात अशी माहिती, अनुपकुमार सिंग यांनी स्पर्धेचे अहवाल वाचनात दिली.
यास्पर्धेतील विजेते याप्रमाणे- सर्वसाधारण विजेता संघ- राज्य राखीव पोलिस दल,
उपविजेते मुंबई शहर.
हॉकी- कोल्हापूर विभाग, फुटबॉल नागपुर शहर, कबड्डी (पुरुष)
– मुंबई शहर, (महिला)- नवी मुंबई, व्हॉली बॉल(पुरुष) मुंबई शहर, (महिला)- नागपुर
शहर, बास्केट बॉल (पुरुष)- कोल्हापुर, (महिला) अमरावती, खो खो (पुरुष) मुंबई शहर, (महिल) मुंबई
शहर, वेटलिफ्टींग – कोल्हापूर, ज्युदो
(पुरुष)राज्य राखीव पोलीस दल, (महिला) मुंबई शहर, बॉक्सिंग राज्य राखीव पोलीस
दल, कुस्ती – कोल्हापूर, ॲथेलिटीक्स
(पुरुष) राज्य राखीव पोलीस दल, (महिला)
कोल्हापुर, तर सर्वोत्कृष्ट
ॲथेलिटचे पारितोषिक राहुल काळे नवी मुंबई, तर महिला खेळाडू जयश्री
बारेखी, कोल्हापुर यांना तर सर्वोत्कृष्ट शूटींग चॅम्पियन मिलिंद भारंबे
यांना देण्यात आले. सर्वोत्कृष्ट संचलनाचे पारितोषिकही राज्य राखीव पोलीस
दलाच्या संघाला मिळाले.
या समारंभाचे प्रास्ताविक महासंचालक संजय बर्वे यांनी केले
तर सूत्रसंचालन स्नेहा आघारकर यांनी केले.
000000
Comments
Post a Comment