किटकनाशक विक्री नियंत्रण धोरण :नागरिकांकडून सुचना अभिप्राय मागवल्या
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6- कीटकनाशके
फवारणीमुळे होणारी मनुष्य व प्राण्यांच्या जीवीत हानीबरोबरच, शिफारस नसलेली कीटकनाशके
व त्यांचा अयोग्य प्रमाणात वापरामुळे पर्यावरणहानी,अन्न घटकांमध्ये कीटकनाशकांचे हानीकारक
अंश सापडून आरोग्य समस्या देखिल निर्माण झालेल्या आहेत. यासाठी राज्य शासनामार्फत यापुढे
जिल्हानिहाय / विभागनिहाय पिक पद्धतीनुसारच केवळ नोंदणीकृत व शिफारस केलेल्याच कीटकनाशकांच्या
विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठीचे धोरण निश्चित करण्यात येत आहे. त्यासाठी या क्षेत्रातील
सर्व नागरीकांकडून यावर सुचना / अभिप्राय मागविण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात
मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या
मार्फत आवाहन करण्यात आले आहे की, खरीप हंगाम 2017 मध्ये कीटकनाशकांची हाताळणी करतांना राज्यात विशेषत: यवतमाळ व राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये शेतमजूर / शेतकरी यांचे विषबाधेमुळे जीवित हानी झालेली आहे. कीटकनाशकांची काळजीपुर्वक हाताळणी करण्यासाठी कृषि विभागाने जनजागृती मोहिम राबवून मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी केलेली आहे. शेतमजूर / शेतकरी यांना भविष्यात कीटकनाशकांची
फवारणी करतांना जीवीतास हानी पोहोचणार नाही यासाठी विशेष काळजी घेणे ही अत्यंत महत्वाची बाब बनली आहे. कीटकनाशक कायदा, 1968 व कीटकनाशके नियम, 1971 मधिल तरतुदीनुसार राज्यामध्ये कीटकनाशके उत्पादन, साठवणुक, विक्रीसाठी प्रदर्शन
करणे व विक्री करणे यासाठी कीटकनाशकांचे
परवाने दिले जातात. केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती
(Central Insecticides Board & Registration Committee), फरिदाबाद या देश पातळीवरील सर्वोच्च यंत्रणेद्वारे नोंदणी झालेल्याच कीटकनाशकांना
परवान्याद्वारे राज्यात उत्पादन, साठवणुक, विक्रीसाठी प्रदर्शन करणे व विक्री करणे यासाठी परवानगी दिली जाते. ही सर्वोच्च यंत्रणा, प्रत्येक कीटकनाशकांच्या
नेमक्या किती तीव्रतेस एखाद्या विशिष्ट पिकावरील, विशिष्ट कीड / रोगाच्या नियंत्रणास
योग्य ठरेल याच्या शिफारशी देखिल निश्चित करते.
कीटकनाशकांच्या
फवारणीमुळे मृत्यु पावलेल्या शेतमजूर / शेतकरी प्रकरणांचा राज्य शासन व कृषि क्षेत्रातील
तज्ज्ञांमार्फत झालेल्या अभ्यासातून खालील बाबी ठळकपणे निदर्शनास आलेल्या आहेत.
अ)
ज्या पिकासाठी / कीडीसाठी शिफारस केलेली आहे त्यासाठी निश्चित केलेल्या कीटकनाशकां
व्यतिरिक्त इतर शिफारस नसलेली कीटकनाशके विक्री व
वापर.
ब) निश्चित / शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त
तिव्रतेच्या कीटकनाशकांची विक्री व वापर.
क) पिक संरक्षणा करीता शिफारस नसलेली कीटकनाशके विक्री
व वापर.
ड) शिफारस नसलेल्या वेगवेगळ्या कीटकनाशकांची मिश्रणे
विक्री व वापर.
या पार्श्वभूमीवर,
राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, सोबतच्या यादीतील केंद्रीय
कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIB & RC), फरिदाबाद यांनी शिफारस केलेल्या प्रमाणेच
कीटकनाशकांचा वापर करावा. तसेच सर्व कीटकनाशके उत्पादक, वितरक व विक्रेत्यांना याद्वारे
स्पष्ट निर्देश देण्यात येत आहेत की, शिफारशी नसलेल्या कीटकनाशकांची विक्री होणार नाही
याची दक्षता घ्यावी. विक्रेत्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पिक पद्धतीनुसार आवश्यक
त्या पिकांची / कीड रोग नियंत्रणांचीच कीटकनाशके विक्री करावीत.
केंद्रीय कीटकनाशक
मंडळ व नोंदणी समिती, फरिदाबाद यांनी पिकनिहाय शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा तपशिल
कृषि विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in/ या वेबसाईटमधिल निविष्ठा मेनुतील कीटकनाशक या पर्याया अंतर्गत दिलेल्या ‘सर्वसाधारण
माहिती’ मध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे.
कीटकनाशके
फवारणीमुळे होणारी मनुष्य व प्राण्यांच्या जीवीत हानीबरोबरच, शिफारस नसलेली कीटकनाशके
व त्यांचा अयोग्य प्रमाणात वापर याचा पर्यावरणहानी बरोबरच मनुष्य व प्राण्यांच्या अन्न
घटकांमध्ये कीटकनाशकांचे हानीकारक अंश सापडून आरोग्य समस्या देखिल निर्माण झालेल्या
आहेत. यासाठी राज्य शासनामार्फत यापुढे जिल्हानिहाय / विभागनिहाय पिक पद्धतीनुसारच
केवळ नोंदणीकृत व शिफारस केलेल्याच कीटकनाशकांच्या विक्रीवर नियंत्रण आणन्यासाठीचे
धोरण निश्चित करण्यात येत आहे. त्यासाठी या क्षेत्रातील सर्व नागरीकांकडून यावर सुचना
/ अभिप्राय मागविण्यात येत आहेत.
यासाठी आपल्या
सुचना / अभिप्राय लिखित स्वरूपात मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, कृषि आयुक्तालय,
महाराष्ट्र राज्य, सेंट्रल बिल्डिंग, पुणे – 411001 या पत्त्यावर किंवा cqcopest@gmail.com या e-mail ID वर पाठवावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment