जलसमृध्दी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना :सुशिक्षित बेरोजगारांना उत्खनन यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य जिल्ह्यातून निवडणार 15 लाभार्थी; प्रस्ताव मागविले




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10-राज्यातील जलयुक्त शिवार अभियान,जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना  दि.2 जानेवारी 2018 पासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातून 15 लाभार्थ्यांची निवड करावयाची असून त्यासाठी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये, राज्यात जलयुक्त शिवार अभियान,जल व मृद  संधारणची कामे करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार तरुण,शेतकरी उत्पादन संस्था,नोंदणीकृत शेतकरी गटास, बेरोजगाराच्या सहकारी संस्था,विविध कार्यकारी संस्था यांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन त्यांना उत्खनन यंत्र सामुग्री (अर्थमुव्हर्स) खरेदी करण्यासाठी वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध करुन देण्यात  येणार आहे. आणि कर्जावरील व्याजाचे दायित्व  शासनातर्फे अदा करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यामध्ये या योजनेचा कालावधी दिनांक 31 मार्च 2018 पर्यंत राहील.
            या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यासाठी 15 लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे.   ज्या लाभार्थ्यांकडे स्वत:च्या मालकाची यंत्रसामुग्री नसेल असे सुशिक्षित युवक स्वत:चा 20 टक्के रक्कमेचा  किमान हिस्सा भरुन या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
लाभार्थी निवडीसाठी प्रथम  सुशिक्षित बेरोजगार,- शेतकरी उत्पादक कंपनी - बेरोजगारांच्या सहकारी संस्था - नोंदणीकृत गट शेती - विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था याप्रमाणे प्राधान्यक्रम राहील.
लाभार्थ्यांच्या निवडीसाठी  प्रत्येक जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. ती याप्रमाणे-
अध्यक्ष जिल्हा अधिक्षक,कृषी अधिकारी तथा जिल्हा मृदसंधारण अधिकारी,कार्यकारी अभियंता,लघुसिंचन (जलसंधारण) तथा जिल्हा संधारण अधिकारी, सदस्य तर  जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड हे सदस्य सचिव आहेत.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे. ऑनलाईन प्राप्त अर्जांची छाननी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत करण्यात येईल. पात्र प्रस्ताव महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळास सादर करण्यात येतील.
जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कार्यवाही दि.31 मार्च 2018 पर्यंत पूर्ण करावयाची आहे. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे तो याप्रमाणे-
दि.11 रोजी योजनेला वृत्तपत्रातून प्रसिध्दी देणे.,दि.11 ते 31 जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज स्विकृती., दि.1 ते 8 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन प्राप्त अर्जांची छाननी दि. फेब्रुवारी रेाजी जिल्हास्तरीय छाननी समितीची बैठक., दि.12 व 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळास पात्र प्रस्ताव सादर करणे. दि.16 फेब्रुवारी रोजी पात्र लाभार्थी व वित्तीय संस्थांना मान्यता पत्र देणे. दि. 17 फेब्रुवारी रोजी वित्तीय संस्थांकडून पात्र संस्था,व्यक्ती यांना कर्जाची मंजूरी देणे, कर्ज वितरण करणे,मशीन खरेदी करणे, नोंदणी करणे. तसेच दि.13 ते 20 मार्च 2018 पर्यंत कर्ज अदा करणे.
तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी पुढे यावे व आपले प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन  जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष तथा जिल्हा अधिक्षक,कृषि अधिकारी तथा जिल्हा मृदसंधारण अधिकारी, रायगड अलिबाग बी.बी.शेळके, व सदस्य सचिव पी.एम.खोडका, यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक