रंग दे महाराष्ट्र द्वारे रंगल्या शाळांच्या भिंती: सामाजिक एकोपा हीच परिवर्तनाची गुरुकिल्ली- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी



अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.28:- जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. मात्र सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल तर गावात एकोपा असणे आवश्यक आहे. गाव एक झालं तर काहीही साध्य करु शकते. सामाजिक एकोपा हीच खरी परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे', असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज मुठवली ता. माणगाव येथे केले.यावेळी ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक उपस्थित होते.
या अभियानांतर्गत निवडलेल्या निवडक गावातील कामांची पाहणी करुन ग्रामस्थांशी चर्चा या पथकाने आज केली. त्या अंतर्गत आज सकाळी मुठवली या गावी आज सकाळी ग्रामस्थांशी सर्व अधिकाऱ्यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव,प्रांताधिकारी देगावकर, तहसिलदार उर्मिला पाटील, गटविकास अधिकारी खेडकर,उपविभागीय कृषि अधिकारी येवले तसेच स्वदेस फाऊंडेशचे तुषार ईनामदार तसेच ग्राम सामाजिक परिवर्तक लहू दोलताडे यांच्यासह ग्रामस्थ महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रह्मण्यम यांनी गावात विविध उद्योग व्यवसाय करणाऱ्या कुटूंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी व विचारपूस केली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधतांना डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, 'गाव करी ते राव न करी अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणेच गावाने एकत्र येऊन ठरवावे,त्यांना हवा तो विकास ते करु शकतात. त्यासाठी शासनाची यंत्रणा नेहमी त्यांना सहयोग करेल.  गावच्या शाळेचा विकास करा. त्यासाठी ग्रामस्थांनी योगदान द्या. हे योगदान आपल्या मुलांच्या विकासासाठी आज केलेली मोठी गुंतवणूक ठरेल. गावकऱ्यांनी मिळून गावात नियमित स्वच्छता अभियान राबवावे,जेणे करुन स्वच्छतेची सवय मुलांच्या अंगी बाणावेल'.
आपल्या संबोधनात सुब्रहण्यम यांनी 'गावकऱ्यांनी ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियान हे गावकरी आणि शासन  यांनी एकत्र येऊन तयार केलेले विकासाचे मॉडेल ठरावे व त्याची सुरुवात रायगड जिल्ह्यात व्हावी, असे चांगले काम करावे', असे आवाहन केले.
 ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी गावातील जि.प. शाळेच्या रंगकामात सहभाग दिला. यावेळी शाळेच्या भिंती रंगवण्यासाठी  मोठ्या प्रमाणावर सेवाभावी कार्यकर्त व जे.एज. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी गावात आले होते. त्यांच्या मदतीने शाळेचे रंगकाम सुरु होते. 'रंग दे महाराष्ट्र' या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील मुठवली ता. माणगाव येथील शाळेच्या भिंती आज रंगल्या. हे रंगकाम एरवीच्या रंगकामापेक्षा वेगळे होते. शालेय विद्यार्थ्यांना अधिक आकलन व्हावे यासाठी या भिंतींवर शैक्षणिक चित्रे चितारण्यात आली. या अभियानात आज स्वतः जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आणि ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम हे ही सहभागी झाले होते.
 दुपारनंतर या पथकाने महागाव, नवघर ता. सुधागड या गावातील कामांची पाहणी करुन ग्रामस्थांशी संवादही साधला.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक