पावसाळी मासेमारी बंदी 1 जून पासून लागू
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अंतर्गत राज्याच्या जलधीक्षेत्रात
यांत्रिक मासेमारी नौकास पावसाळी मासेमारी बंदी तसेच मासळीच्या साठ्यांचे जतन व
मच्छिमारांचे जिवीत व वित्त याचे संरक्षण व्हावे यासाठी शुक्रवार दि.1
जून ते मंगळवार दि.31 जुलै 2018 (दोन्ही दिवस धरुन) एकूण 61 दिवस
राज्याच्या सागरी जलधीक्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 मैलांपर्यंत)या कालावधीत यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी
बंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती
प्र. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय,(तांत्रिक) दि.हं.पाटील यांनी दिली आहे.
या
संदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात म्हटल्यानुसार, या कालावधीत मासळीच्या जीवांना
प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या
बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्यांचे जतन होते. तसेच या कालावधीत
खराब, वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारांची जिवीत व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे
टाळता येते. पावसाळी मासेमारी बंदी ही
पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिक नौकांना लागू राहणार नाही तर
राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासून 12 मैलापुढे) खोल
समुद्रात मासेमारी जाणाऱ्या सागरी नौकांस केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील
मासेमारीबाबतचे धोरण, मार्गदर्शक सूचना व आदेश लागू राहातील. तसेच राज्याच्या
सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 मैलापुढे) यांत्रिकी मासेमारीं
नौकांस पावसाळी मासेमारी बंद कालावधीत मासेमारी करतांना आढळल्यास किंवा केल्यास
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतग्रत च्या कलम 14 अन्वये असे
गलबत व पकडलेली मासळी जप्त करण्यात येईल. तसेच कलम 17 (1)(2)(3) अन्वये जास्तीत
जास्त् कठोर शास्ती लादण्यात येईल. बंदी कालावधीत ज्या मच्छिमार सहकारी
संस्थांच्या यांत्रिक मासेमारी नौका मासेमारी करतांना आढळतील अशा संस्थांचे विविध
लाभांसाठीचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात
झाल्यास अशा नौकेस शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार नाही. बंदी कालावधीत राज्याच्या
सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौका अवागमन निषिद्ध आहेत.
तसेच
राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 मैला पर्यंत)पावसाळी
मासेमारी बंदी कालावधीत यांत्रिक मासेमारी नौकेने बेकायदेशीर मासेमारी न करणेबाबत
आपले अधिनस्त सर्व मच्छिमार सहकारी संस्थांस अवगत करावे व बंदी कालावधीत आपल्या
कार्यक्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकेने बेकायदेशीर मासेमारी केली जाणार नाही तर
पावसाळीचा मासेमारीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन
दि.हं.पाटील,प्र. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय,(तांत्रिक),रायगड-अलिबाग यांनी
केले आहे.
०००००
Comments
Post a Comment