रायगड जिल्ह्यातून करु या ॲनिमिया हद्दपार महाड येथील आरोग्य पोषण आहार कार्यशाळेत व्यक्त झाला निर्धार



अलिबाग, जि. रायगड, दि.२३ (जिमाका)- देशाची भावी पिढी सक्षम, सुदृढ आणि तंदुरुस्त घडवायची असेल तर माता, गरोदर माता, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषण आहार स्थिती सुधारणा कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. हा कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील ज्या 22 ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे, तेथे राबवून संपुर्ण जिल्ह्यात राबवावा, आणि रायगड जिल्ह्यातील महिलांमधील रक्ताल्पता (ॲनिमिया)चे प्रमाण व अर्भक मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी साऱ्यांनी निर्धार करु या, असे आवाहन केंद्रीय नीती आयोगाच्या तांत्रिक मंडळाच सदस्य डॉ. राजकुमार भंडारी यांनी केले.
जिल्हा ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत समाविष्ट 22 ग्रामपंचायतींमधील आरोग्य कर्मचारी, जिल्हास्तरीय आरोग्य यंत्रणा प्रमुख तसेच ग्राम परिवर्तक, वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी आदींसाठी आरोग्य पोषण आहार विषयक कार्यशाळा आज महाड येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, 'अरमान' या सामाजिक संस्थेच्या डॉ. अपर्णा हेगडे,जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्यासह गटविकास अधिकारी , तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षक, आशा कार्यकर्ता व त्या त्या गावातील ग्राम परिवर्तक आदी उपस्थित होते.
  यावेळी बोलतांना डॉ. भंडारी म्हणाले की, अर्भक मृत्यू दर, मातांमधील रक्ताल्पतेचे(ॲनिमिया) प्रमाण शून्यावर आणणे, कुपोषणाच्या विविध अवस्थेतील बालकांची आरोग्य स्थिती सुधारणे, मातांना गरोदर अवस्थेत उत्तम पोषण आहारासंदर्भात मार्गदर्शन करणे अशा विविध उपाययोजनांनी ही स्थिती सुधारुन जिल्ह्यातील पोषण आहार स्थिती सुधारण्यासाठी सर्व यंत्रणांच्या समन्वयाने कार्यक्रम राबविला जाईल. त्यासाठी ग्रामिण भागात त्यांच्यामार्फत गरोदर माता व बालकांचे दैनंदिन समुपदेशन व उपचार केले जातील. परस्पर समन्वय व वैयक्तिक संवाद यावर भर देऊन हा कार्यक्रम राबविला जाईल. त्यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचे एकत्रिकरण करुन लाभ देण्यास प्राधान्य असेल.
यावेळी डॉ. अपर्णा हेगडे यांनी अरमान या संस्थेमार्फत या उपक्रमात दिल्या जाणाऱ्या सेवांविषयी सविस्तर माहितीचे सादरीकरण केले. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने तसेच अन्य सर्व विभागांनी या उपक्रमास राबवून रायगड जिल्हा ॲनिमिया मुक्त करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन केले.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक