रायगड पोलीस दलातर्फे नागरीकांना जाहीर आवाहन
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2- मागील काही दिवसांपासून काही समाज कंटक
व्हॉटसप, फेसबुक आदि सोशल मिडीयाचे माध्यमातून मुले पळविणारी टोळी जिल्ह्यात आली, किंवा
चोर आले अशा प्रकारच्या अफवा पसरवित आहेत. अशा अफवांमुळे इतर जिल्ह्यात जमावाकडून बहुरुपी,
वाटसरु, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत. तर काही घटनांत
खून झाले आहे. त्यातून अशा जमावावर खुना सारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यातही अशा अफवा पसरविल्या जात असून लोकांमध्ये
भिती पसरली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षक रायगड व जिल्हा पोलीसांनी
जनतेस आवाहन केले आहे की, लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. अशी माहिती मिळाल्यास तातडीने
जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. जर कोणी अशा प्रकारचे अफवा पसरवित असेल तर त्याचे
नाव पोलिसांना कळवावे. खात्री केल्याशिवाय सोशल मिडीयावर आलेला कोणताही मॅसेज अन्य
ठिकाणी फॉरवर्ड करु नये. सोशल मिडीयातून आलेल्या मॅसेजवर डोळे झाकून विश्वास ठेऊ नये.
अफवा पसरविणाऱ्या तुमच्या प्रत्येक पोस्टवर
पोलिसांचे लक्ष आहे. अफवा पसरविण्यात हातभार लावल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात
येईल. अफवेला बळी पडून आपल्या हातून गंभीर गुन्हा घडल्यास संपूर्ण आयुष्य तुरुंगात
काढावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरीकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवून स्वत:हून
कायदा हातात घेऊ नये. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे
असे आवाहन रायगड पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment