मुरुड येथील जलशुद्धीकरण केंद्राची तात्काळ दुरुस्ती करा पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचे निर्देश


अलिबाग जि.रायगड,दि.5(जिमाका)- मुरुड शहराला पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र सध्या नादुरुस्त असल्याने नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा होऊ शकत नाही. तातडीने शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी जलशुद्धीकरण केंद्र तात्काळ दुरुस्त करुन मुरुडवासीयांना शुद्ध पाणी पुरवठा करावा, तसेच तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा, असे निर्देश राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण यांनी आज येथे दिले.
मुरुड तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत पालकमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह मुरुड येथे गुरुवारी (दि.4) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुरुड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती स्नेहा पाटील, उपविभागीय अधिकारी अलिबाग श्रीमती शारदा पोवार, सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबागचे कार्यकारी अभियंता आर.एस.मोरे, मुरुडचे तहसिलदार उमेश पाटील,  जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भोसले, नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, महावितरण उपविभाग मुरुडचे एस.आर.येरेकर, गट विकास अधिकारी राजनंदिनी भागवत, मुरूड आगार प्रमुख युवराज कदम ,मुरूडचे उपअभियंता शैलेश शिंदे आदि उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना पालकमंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, मुरुड तालुक्यातील शहरी भागात व ग्रामीण भागात असलेल्या अनेक समस्या नागरिकांनी मांडलेल्या आहेत. या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याशी संबंधित असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत.   पाणी ही नागरिकांची अत्यावश्यक सेवा असून  मुरुड शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी  पुरवठा करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत.   ग्रामीण रुग्णालयात आलेल्या रुग्णांनाही योग्य ती सेवा आरोग्य विभागाने द्यावी.  तसेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत तालुक्यात करण्यात येणारे रस्ते, पूल यांचीही कामे अपूर्ण असल्यास तीही पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी  सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य कार्यवाही करुन ते काम पूर्ण करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्या असे निर्देशही ना. चव्हाण यांनी यावेळी दिले.
या बैठकीला विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक