पोलीस भरती प्रक्रियेत बदल
अलिबाग,जि.रायगड,
दि.18(जिमाका)- राज्यातील पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत बदल
करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हा पोलीस
अधीक्षक कार्यालयामार्फत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरुपात बदल झालेला
आहे. त्यात बुद्धिमान उमेदवारांची
आवश्यकता, भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी
दरम्यान होणाऱ्या दुर्घटना आदी बाबी विचारात घेऊन
गृह विभागाने शासन निर्णयाद्वारे भरती प्रक्रियेत बदल केला आहे. त्यानुसार, नवीन पद्धतीत उमेदवारांची लेखी
परीक्षा आधी घेण्यात येणार आहे. लेखी
परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांपैकी पोलीस
घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणाऱ्या पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढ्याच योग्य उमेदवारांना शारीरिक
चाचणीसाठी बोलावण्यात येईल. याबदलांमुळे भरती प्रक्रिया दीर्घकाळ सुरु न राहता जलद
गतीने पार पडेल. जिल्ह्यातील उमेदवारांना
जास्त दिवस ताटकळत रहावे लागणार नाही. भरती प्रक्रियेत केलेल्या बदलांचा फायदा
उमेदवारांना निश्चितच होईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी कळविले
आहे.
00000
Comments
Post a Comment