दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत कौशल्य विषयक कार्यशाळा संपन्न
नवी मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत कौशल्य विषयक कार्यशाळेचे आयोजन आज ग्रामविकास भवन, खारघर, नवी मुंबई येथे करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय ग्राम विकास विभागाच्य अतिरिक्त सचिव अलका उपाध्याय, केंद्रीय कौशल्य विभागाचे सह सचिव चरणजित सिंग, ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर.विमला हे उपस्थित होते.
केंद्र शासनामार्फत दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत कौशल्य विकासाचा कार्यक्रम राबविला जातो. तरुणांना रोजगार मिळण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी संस्था यांच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येते व त्यामधून तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतात.
या कार्यशाळेची थीम “कौशल्य विकास” ही होती. कुठलेही काम करताना त्यामध्ये कौशल्य असणे खूप महत्वाचे असते. कौशल्य विषयक प्रशिक्षणामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. या योजने अतंगर्त ग्रामीण भागातील तरुण सुशिक्षित बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योन्मुख होण्याकडे त्यांचा कल वाढविणे व नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना अधिकाधिक प्रयत्नशील करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या प्रशिक्षणासाठी प्रकल्प अंमलबजावणी संस्थांना प्रशिक्षणाचा निधी टप्याटप्याने दिला जातो. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या काळात राहण्याच्या सोयीसुविधा देण्यात येतात. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात गुणात्मकदृष्टया प्रशिक्षण कार्यक्रम अधिक सुरळीत व सुत्रबध्दरितीने सुरु आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली. आर.विमला यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सादरीकरणाद्वारे विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी दीनदयाल उपाध्याय योजने अंतर्गत प्रशिक्षण घेऊन विविध विभागात काम करणाऱ्या युवक युवतींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
-----------------
Comments
Post a Comment