छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे कार्य पुढे नेऊ या- जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी
अलिबाग,जि. रायगड,दि.26(जिमाका)- राजर्षी छत्रपती
शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या भूमीतील एक थोर व्यक्तिमत्त्व होते. समाजातील गोर गरीब,
मागासलेल्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी सुरू केलेले सामाजिक न्यायाचे कार्य
आपण साऱ्यांनी मिळून पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात जिल्हाधिकारी
डॉ.विजय सूर्यवंशी यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यप्रति आपल्या भावना व्यक्त
केल्या.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या
जयतींनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात सामाजिक न्याय दिन कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास उपायुक्त तथा जातपडताळणी
समितीचे सचिव विशाल नाईक, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, आनंदराज घाडगे आदी मान्यवर
उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रज्वलन
करण्यात आले, त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार वितरण तसेच सामाजिक
न्याय विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना विविध लाभाचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या
हस्ते करण्यात आले. आनंदराज घाडगे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्याविषयी
माहितीपर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक किरण मेहेत्रे यांनी
केले. विशाल नाईक यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करून छत्रपती शाहू महाराजांच्या
ध्येय धोरणांची महती सांगितली. उपस्थितांचे आभार किरण मेहेत्रे यांनी मानले.
00000
Comments
Post a Comment