केंद्र शासनाच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचवा---खासदार श्रीरंग बारणे



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29-  केंद्र शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजना असून त्यांची अंमलबजावणी करुन त्या जिल्ह्यातील सामान्य जनतेपर्यंत पोहचवा असे निर्देश खासदार तथा अध्यक्ष जिल्हा विकास  समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती श्रीरंग बारणे यांनी आज येथे दिले.  जिल्हा नियोजन भवन सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
            यावेळी खासदार सुनिल तटकरे, आ. जयंत पाटील, आ.मनोहर भोईर, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीम.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी, अलिबाग नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक आदि उपस्थित होते. 
            यावेळी खा.श्री.बारणे म्हणाले की, जिल्ह्यातील जनतेसाठी केंद्र शासन अंगिकृत असलेल्या अनेक योजना शासन राबवित असून या योजनांच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती करणे आवश्यक आहे.   प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना,प्रधानमंत्री आवास योजना(शहरी), दीन दयाळ उपाध्याय,जलमार्ग विकास कार्यक्रम,प्रधानमंत्री फसल विमा योजना,प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अशा अनेक विविध असलेल्या  योजनांचा लाभ शहरी तसेच ग्रामीण जनतेला देण्यात यावा अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.  जिल्ह्यातील कोणताही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.  तसेच जिल्हृयात राबविण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या विविध योजना संदर्भातील आढावा त्यांनी यावेळी उपस्थित अधिकारी वर्गाकडून जाणून घेतला.  बैठकीच्या प्रारंभी दु:खवट्याच्या मंजूर ठरावाचे वाचन करुन श्रदांजली अर्पण करण्यात आली. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव अभिनंदनाचे ठराव वाचून दाखविले.
            या बैठकीला जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती सभापती, नगर परिषदेचे नगराध्यक्ष तसेच विविध शासकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक