“करोना विषाणू..कोविड-19” काळजी करू नका.. काळजी घ्या ! समजून घेऊ.. काय आहे लॉकडाऊन?




करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत.   
              रायगड जिल्हयाच्या संलग्न ठाणे, पुणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग व सातारा या जिल्ह्याच्या सीमा जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा व नाशवंत मालाच्या वाहतुकीव्यतिरिक्त अन्य वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत.
             कोविड-19 (करोना विषाणू) याचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन करण्याची अधिसूचना शासनाने जारी केली आहे.  या कालावधीत राज्य शासनाचे विभाग आणि कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रम हे फक्त अत्यावश्यक सेवा देण्यासाठीच कार्यरत राहतील.  सर्व शैक्षणिक प्रशिक्षण,संशोधन आणि मार्गदर्शक संस्था बंद राहतील.  अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापना यांना पुढील निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
चला तर जाणून घेऊया की, काय आहेत या बाबी ?
लॉकडाऊन-काय वगळले आहे?
* रुग्णालये,औषधालये आणि चष्म्याची दुकाने,औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक.
* टेलिकम्युनिकेशन, इंटरनेट,डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा.
* शीतगृहे आणि कोठारगृहांची सेवा.
* मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे.
* अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक.
* शेतमाल आणि अन्य वस्तूंची निर्यात आणि आयात.
* खाद्यपदार्थ औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांसह अत्यावश्यक वस्तूंचे ई-कामर्सद्वारे वितरण.
* पेट्रोलपंप,एलपीजी गॅस,ऑईल एजन्सीज त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक व्यवस्था.
* अत्यावश्यक सेवांकरिता खासगी संस्थांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षा सेवेसह अन्य सेवा देणाऱ्या संस्था.
* टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा.
* पावसाळ्यापूर्वीची सर्व अत्यावश्यक कामे.
* किमान मनुष्यबळासह बँका/एटीएम,भारतीय रिझर्व्ह बँक,फिन्टेक सेवा (स्टॉक एक्सचेंज,क्लीअरींग ऑपरेशन, म्युच्युअल फंडस,स्टॉक ब्रोकर्स) अन्य संबंधित सेवा,विमा,नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन,ऑफ इंडिया,कॅश लॉजिस्टिक्‍  आणि कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या.
* सर्व संप्रदायांची सर्व धार्मिक स्थळे लोकांसाठी बंद राहतील.
*  लोक एकत्र जमतील अशा सर्व सामाजिक, राजकीय,क्रीडा,मनोरंजन,शैक्षणिक,सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रमांना बंदी राहील.
*आदरातिथ्याशी संबंधित सेवा स्थगित राहतील. तथापि बंदी (लॉकडाऊन) मुळे अडकलेले पर्यटक,व्यक्ती,वैद्यकीय,अत्यावश्यक व आणीबाणीच्या सेवेतील कर्मचारी,हवाई आणि सागरी सेवेतील व्यक्तींच्या राहण्यासाठी उपयोगात आणाले जाणारे हॉटेल्स,होमस्टे,लॉजेस आणि मॉटेल्स यांना व विलगीकरणासाठी (कॉरंटाईन)  वापरण्यात येणाऱ्या वास्तू (इस्टॅब्लीशमेंट) यांना यातून सूट देण्यात आली आहे.  
*अंत्यविधीसारख्या प्रसंगी वीस पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी दिली जाणार नाही.
*बंदीच्या काळात अत्यावश्यक गरजेच्या वस्तूंच्या पुरवठ्याबाबत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही,यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील.
* बंदीच्या काळात अत्यावश्यक गरजेच्या वस्तूंच्या पुरवठ्याबाबत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही,यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. 
* कोविड-19च्या रुग्णांना योग्य त्या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व खाजगी आणि शासकीय रुग्णालयातील वैकल्पिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येतील.
* गरज भासल्यास,आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्त,महानगर पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना रुग्णालयाच्या आसपास उपलब्ध जागांचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 
* 15 फेब्रुवारीनंतर भारतात आलेल्या आणि विलगीकरणात राहण्याचा निर्देश देण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने या निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे.  अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि त्याला शासकीय विलगीकरण व्यवस्थेत स्थलांतरीत केले जाईल.
* सर्व रहिवाशांनी घरातच थांबावे.  केवळ परवानगी देण्यात आलेल्या कारणांसाठीच त्यांना बाहेर पडता येईल.  तथापि बाहेर पडल्यानंतर त्यांना परस्परांपासून किमान अंतर राखण्याचा दंडक पाळणे आवश्यक असेल.  तसेच संबंधित संस्था, कर्मचारी यांनी कोविड-19 संबंधी आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेले निर्देश पाळणे बंधनकारक राहील. 
* सर्व जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त महानगरपालिकांचे आयुक्त आणि इतर संबंधित संस्था,आस्थापना यांचे सक्षम प्राधिकारी यांना मानवीय व न्यायपूर्ण पध्दतीने वरील सर्व उपाययोजना व तरतूद यांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकार देण्यात आले आहेत.
* कोणतीही व्यक्ती,संस्था या तरतुदींचा भंग करतील त्यांच्यावर साथ रोग कायदा-1897,आपत्ती व्यवस्थापना कायदा-2005 आणि इतर कायदे व विनियमने यानुसार कार्यवाही करण्यात येईल अथवा सदहेतूने कार्यवाही करणाऱ्या व्यक्तीविरुध्द वा तसा हेतू असणाऱ्या व्यक्तीविरुध्द कायदेशीर कारवाई केली जाणार नाही.
* अत्यावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्या संस्था तसेच संबंधित कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांवर अत्यावश्यक सेवा असे ठळकपणे दिसणारे यंत्रणांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कळविण्यात येईल. 
* उपरोक्त निर्देशांचे पालन होण्याकरिता जेव्हा कधी आवश्यकता भासेल तेव्हा जिल्हा न्यायाधीश कार्यकारी न्यायाधीशांची नेमणूक करतील.
* दवाखान्यांच्या पायाभूत सुविधा तसेच विस्तारीकरणाच्या कामासाठी होणाऱ्या साधनसामग्रीच्या वाहतुकीमध्ये बांधा येणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी.
* अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता संबंधित जिल्ह्यातील सक्षम प्राधिकाऱ्यांनी घ्यावी.
जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी विशेषतः पुणे आणि मुंबई येथून येणाऱ्या नागरिकांना आवाहन केले आहे की, या जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी स्वतःला Home Quarantine करून सोशल डिस्टंन्सिंग कटाक्षाने पाळावे तसेच स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी.
अशा प्रकारे शासन आणि प्रशासन मिळून दिवसरात्र करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी, त्यापासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी विविध पातळ्यावर विविध माध्यमातून सतत अथक प्रयत्न करीत आहेत. तेव्हा नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन स्वत:चे आणि स्वत:च्या कुटुंबियांचे आरोग्य सुरक्षित राहील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.  जास्तीत जास्त घरातच थांबावे, अनावश्यक कारणास्तव घराबाहेर पडणे टाळावे,प्रशासन देत असलेल्या सूचनांचे अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे वागावे.   ऐकीव माहितीवर, अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे. 
आपल्याला सर्वांना मिळून करोना विषाणू या संकटावर घरातच बसून मात करावयाची आहे.  आपल्यासाठी आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या   सुरक्षिततेसाठी हे करायलाच हवे..... चला तर मग लॉकडाऊन कटाक्षाने पाळू या!   

 (मनोज शिवाजी सानप)
 जिल्हा माहिती अधिकारी,
  जिल्हा माहिती कार्यालय,
रायगड-अलिबाग
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक