तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर होणार कारवाई चौकशी करून कारवाई करण्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे आदेश
अलिबाग, जि.
रायगड, दि.15 (जिमाका) : पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधून मागील काही
दिवसांपासून तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढले
आहे. त्यामुळे पनवेल परिसरात वायू प्रदूषण होत असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत
आहे. अशा वायू प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांची चौकशी करून कारवाई करण्याबाबतचे आदेश
उद्योग मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी प्रदूषण नियंत्रण
मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मागील काही दिवसांपासून तळोजा औद्योगिक वसाहतीमधील
कंपन्यांमधून वायू व जल प्रदूषण होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली
आहे. केमिकल कंपनीमधून येणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरात उग्र वास येत असून नागरिकांना
श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष
श्री. सुदाम पाटील यांनी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्याकडे केली होती. या तक्रारीची
लागलीच दखल घेत पालकमंत्री कु. तटकरे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना
चौकशी करून संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
पालकमंत्र्यांचे आदेश मिळताच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे
रायगड जिल्हा प्रादेशिक अधिकारी श्री. साळुंखे यांनी प्रदूषण होत असलेल्या ठिकाणी पाहणी
केली असून दोषी कंपन्यांवर लवकरच कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
000000
Comments
Post a Comment