जिल्ह्यातील करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी दि.15 ते 26 जुलै या कालावधीत लॉकडाऊन जाहीर
वृत्त क्रमांक
:- 963 दिनांक :- 15
जुलै 2020
अलिबाग, जि.रायगड, दि.15 (जिमाका) : आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील 25 अन्वये जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2
(अ) नसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे या प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. शासनाने करोना विषाणूचा
(कोविड-19) प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.
13 मार्च 2020 रोजी लागू करण्यात आलेला आहे.
गेल्या काही
दिवसांपासून करोना विषाणूचा जिल्ह्यातील वाढता प्रादूर्भाव पाहता यावर ठोस
उपाययोजना करण्याच्या दृष्टीने दोनच दिवसांपूर्वीच पालकमंत्री कु.आदिती तटकरे व
जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच महत्वाचे अधिकारी यांची जिल्हाधिकारी
कार्यालयात बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत सर्वांच्या विचारविनिमयाने जिल्ह्यात
संपूर्ण लॉकडाऊन करुन करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना
राबविण्याचे निश्चित झाले. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी
निधी चौधरी यांनी करोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात पोलीस
अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात दि. 15 जुलै रात्री 12 वाजल्यापासून ते दि. 26 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन
लागू करण्याबाबतचा अध्यादेश बजाविला आहे.
लॉकडाऊनच्या
कालावधीत जिल्ह्यात काय बंद राहणार :-
खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा
पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे राजकीय, सामाजिक,
सांस्कृतिक, करमणूक, स्पर्धा, धार्मिक व अन्य सर्व प्रकारचे कार्यक्रम, समारंभ,
सण, उत्सव, उरुस, जत्रा, आठवडा बाजार, मनोरंजनाचे कार्यक्रम, कार्यशाळा, कॅम्प,
प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, देशांतर्गत व परदेशी सहली
इ. यांचे आयोजन करण्यास मनाई राहील.
दुकाने/सेवा आस्थापना,
शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, आठवडा बाजार, उपहार गृहे, खानावळी, चहा
टपरी, पान टपरी, स्ट्रीट फूड विक्री करणाऱ्या गाड्या संपूर्णतः बंद राहतील.
गॅरेजेस, वर्कशॉप
संपूर्णतः बंद राहतील.
जलतरण तलाव, उद्याने,
मोकळ्या जागा, क्रीडा मैदाने, पर्यटन स्थळे, समुद्रकिनारे, बगीचे, सिनेमागृह,
नाट्यगृह, रिसॉर्ट, व्यायामशाळा, संग्रहालये, ग्रंथालये, सेतू केंद्रे, आधार
केंद्रे, व्हिडीओ पार्लर, ऑनलाईन लॉटरी सेंटर, लाईव्ह ऑर्केस्ट्रा, सोशल क्लब,
मनोरंजनाची ठिकाणी, क्लब/पब इ. संपूर्णतः बंद राहतील.
परमिट रुम, बिअर बार,
वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारुची दुकाने बंद राहतील. तथापि, या आस्थापनांमधून
घरपोच सेवा सुरु राहतील.
ब्युटी पार्लर, सलून,
स्पा संपूर्णतः बंद राहतील.
शाळा, महाविद्यालये,
शैक्षणिक/प्रशिक्षण संस्था व खाजगी शिकवणी वर्ग बंद राहतील. तथापि ‘ऑनलाईन
क्लासेस/डिस्टन्स लर्निंग’ सुरु राहील.
सर्व धर्मियांची
प्रार्थनास्थळे नागरिकांसाठी बंद राहतील. या प्रार्थनास्थळांमध्ये परंपरेनुसार
केली जाणारी नियमित पूजा अर्चा, धार्मिक विधी तीन किंवा त्यापेक्षा कमी
व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यास मान्यता राहील.
कोणत्याही रस्त्यावर,
सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर, गल्लोगल्ली सर्व प्रकारची तीन चाकी वाहने, हलकी
वाहने, मध्यम वजनाची वाहने, रिक्षा, टॅक्सी, दुचाकी वाहने यांच्या वापरावर निर्बंध
लागू करण्यात येत आहेत.
अवजड वाहने, वस्तू
वाहक वाहने (गुड्स कॅरीअर) अबाधितपणे सुरु राहतील. (अत्यावश्यक सेवेकरिता लागणारी
वाहने वगळून या प्रकारची वाहने अत्यावश्यक कारणासाठी रस्त्यावर आल्यास उदा.
वैद्यकीय कारण, तर त्याबाबतचे सबळ पुरावे संबंधितांनी सोबत ठेवणे आवश्यक असेल.)
सर्व
क्रीडांगणाचा/मैदानाचा वापर वैयक्तिक व्यायामासाठी/सरावासाठी करता येणार नाही.
तसेच नागरिकांना मॉर्निंग वॉक, ईव्हिनिंग वॉक, सायकलिंगसाठी बाहेर पडण्यास मनाई
असेल.
नागरी तसेच ग्रामीण
भागात सर्व प्रकारच्या कंपन्या, कारखाने व उद्योग बंद राहतील. तथापि, ज्या
आस्थापना (उदा. माहिती व तंत्रज्ञान उद्योग, मेजर पोर्ट, इम्पोर्ट-एक्स्पोर्ट
करणारे उद्योग, पेट्रोकेमिकल, फर्टीलायझर उद्योग इ.) ज्यांच्याकडे देश व परदेशातील
अतिमहत्वाच्या (क्रिटीकल नॅशनल अॅण्ड इंटरनॅशनल इन्फास्ट्रक्चर) उपक्रमांची
जबाबदारी आहे व या आस्थापना बंद राहिल्याने अशा उपक्रमांच्या प्रक्रियेला बाधा येऊ
शकते, ज्या कंपन्यांची उत्पादन प्रक्रिया अखंडित चालू राहणे (कंटिन्युअस प्रोसेसिंग
इंडस्ट्री) अनिवार्य आहे, अशा सर्व कंपन्या, मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोडक्शन कंपनी,
खाद्य, मेडिकल उपकरण, औषधे, बियाणे, खते इ. चे उद्योग टप्प्याटप्प्याने कमीत कमी
आस्थापनांसह (कमाल 25 टक्के) कार्यान्वित राहतील. या कंपन्यांनी कार्यरत कर्मचाऱ्यांचे
आटी-सीपीआर टेस्ट करणे आवश्यक राहील. याप्रमाणे केलेल्या तपासणी व त्यांच्या
निकालाची माहिती संबंधित तालुका अधिकारी यांना देणे बंधनकारक राहील. खाजगी
आस्थापनांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात (वर्क फ्रॉम होम) संकल्पनेस प्रोत्साहन
देण्यात यावे.
नागरी भागात तसेच
ग्रामीण भागात सर्व प्रकारचे बांधकामे बंद राहतील.
सर्व प्रकारची मंगल
कार्यालये, हॉल इ. तसेच लग्न समारंभ, स्वागत समारंभ इ. बंद राहतील. तथापि, आवश्यक
शारीरिक अंत ठेवून पूर्वनियोजित, परवानगी घेतलेले विवाह समारंभ 20 व्यक्तींच्या
उपस्थितीत पार पाडता येतील.
खाजगी कार्यालये
पूर्णतः बंद राहतील.
सर्व सार्वजनिक व
कामाच्या ठिकाणी मास्क/फेस कव्हर परिधान करणे बंधनकारक असेल, अन्यथा ती व्यक्ती
रक्कम रु. 500 इतक्या दंडनीय कारवाईस पात्र राहील.
महामार्गावरील ट्रक
दुरुस्ती करणारे गॅरेजेस/टायर दुकाने/ढाबा/हॉटेल 10 टक्के कामगारांच्या उपस्थितीत
सुरु राहील. तथापि संबंधित कामगार कोविड-19 विषाणूच्या संसर्गामुळे प्रतिबंधित
केलेल्या क्षेत्रामधून (कंटेन्मेंट झोन) अथवा भविष्यात प्रतिबंधित क्षेत्र घोषित
केल्यास अशा क्षेत्रातून आलेले नसावेत.
कामगारांनी मास्क/फेस
कव्हर परिधान करणे तसेच शारीरिक अंतर ठेवणे बंधनकारक असेल. कामगारांची वैद्यकीय
तपासणी करणे, त्यांना सॅनिटायझर, हँडवॉश, मास्क/फेस कव्हर, हँड ग्लोव्हज
पुरविण्याची जबाबदारी संबंधित कंपन्यांच्या/आस्थापनांच्या मालकांची असेल.
सार्वजनिक ठिकाणी
थुंकल्यास संबंधित व्यक्ती 500 रुपये इतक्या दंडनीय कारवाईस पात्र राहील. कोणत्याही
व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखूजन्य पदार्थ इत्यादीचे सेवन करु
नये.
अनावश्यक गर्दी न होऊ
देता, आवश्यक शारीरिक अंतर ठेवून कमाल 20 व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यविधी पार
पाडता येतील.
लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यात मर्यादित स्वरुपात काय सुरु राहणार :-
निमशासकीय कार्यालये,
सरकारी महामंडळाचे उपक्रम/आस्थापना इत्यादी सुरु राहतील. संबंधितांनी घरी
परतल्यावर मानक कार्यप्रणाली (स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर) अनुसरावी व ज्येष्ठ
नागरिकांपासून दूर रहावे.
सर्व
राष्ट्रीयकृत व आरबीआयने मान्यता दिलेल्या बँका नियमानुसार संपूर्ण मनुष्यबळावर
सुरु राहतील. बँकेच्या इतर ग्राहक सेवा जसे ऑनलाईन, एटीएम सेवा अखंडितपणे सुरु
राहतील.
सर्व
मेडिकल दुकाने तसेच ऑनलाईन औषध वितरण सेवा संपूर्ण कालावधीकरिता सुरु राहतील.
घरपोच सेवेस प्राधान्य देण्यात यावे.
रायगड पोलीस अधीक्षक
यांच्या कार्यक्षेत्रात आवश्यक व अनावश्यक अशा सर्व प्रकारच्या ई-कॉमर्स सेवा उदा.
अॅमेझॉन, फ्लिपकार्ट व सर्व कुरिअर्स सेवा व पोस्टल सेवा सुरु राहतील.
या काळात दारूच्या
दुकानांसह किराणा सामान, चिकन, मटण विक्री होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली
आहे. किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे इ. घरपोच सेवा सकाळी 8
ते रात्री 10 वाजेदरम्यान पुरविण्यास परवानगी राहील. याकरिता आवश्यक पासेस संबंधित
तहसिलदार यांच्याकडून प्राप्त करुन घ्यावेत. तसेच इतर घरपोच सेवा चालू राहतील.
त्यासाठीदेखील तहसील कार्यालयाकडून पासेस घ्यावेत.
दूध विक्री व दूधाचे
घरपोच वितरण करण्यास सकाळी 8 ते रात्री 10 वाजेदरम्यान परवानगी राहील. याकरिता
आवश्यक पासेस संबंधित तहसिलदारांकडून प्राप्त करुन घ्यावेत.
सर्व घरगुती वापराच्या
गॅस सिलेंडरचे वितरण सुरु राहील. सर्व डिझेल, पेट्रोल व सीएनजी पंप सुरु राहतील.
तथापि, ते केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहनास इंधन
पुरवठा करतील.
सर्व शेतीची कामे,
कृषीविषयक व कृषी पूरक बाबी तसेच त्यांची वाहतूक सुरु राहील. कृषी पूरक उत्पादने,
खते व बियाणे त्यांचे किरकोळ तसेच घाऊक विक्रेते यांची दुकाने सुरु राहतील व घरपोच
सेवा देता येईल.
जिल्ह्यात निसर्ग
चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, घरे, इमारती, गोठे इत्यादीच्या
पुर्नबांधणीचे / दुरुस्तीचे काम सद्य:स्थितीत सुरु आहे. त्याकरिता नागरिकांना लागणारे
साहित्य पुरविण्यासाठी व दुरुस्तीची कामे करण्यासाठी घरपोच सेवा देता येईल.
त्याकरिता आवश्यक पासेस संबंधित तहसिलदारांकडून प्राप्त करुन घ्यावेत.
पोलीस, शासकीय
कार्यालये, आरोग्य सेवक, पर्यटकांसह अन्य अडकलेल्या व्यक्ती, अलगीकरण कक्ष
(क्वारंटाईन फॅसिलिटी) इत्यादी करिता पुरविल्या जाणाऱ्या सेवांकरिता हॉटेल, उपहार
गृहे, खानावळी यांचे स्वयंपाकगृह सुरु राहतील व त्याद्वारे त्यांना केवळ पार्सल
सेवा किंवा घरपोच सेवा पुरविता येतील. हॉटेल्स हे फक्त तेथे निवासी असलेल्या
ग्राहकांना अन्नसेवा देऊ शकतील.
प्रसारमाध्यमांची
(सर्व प्रकारचे दैनिक, नियतकालिके, टिव्ही न्यूज चॅनल इ.) कार्यालये, त्यांची छपाई
व वितरण व्यवस्था तसेच डिजिटल/प्रिंट मीडिया यांची कार्यालये शासकीय नियमानुसार
सुरु राहतील व त्यांची वाहने यांची वाहतूक सुरु राहील. दैनिक वर्तमानपत्रे,
नियतकालिके यांचे वितरण सकाळी 6 ते 10 या वेळेमध्येच अनुज्ञेय राहील.
पाणीपुरवठा करणाऱ्या
खाजगी व सरकारी संस्था, साफसफाई करणाऱ्या संस्था, त्यांच्या गाड्या व जनजागृती
करणाऱ्या गाड्या, दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या संस्था, विद्युत पुरवठा
करणाऱ्या संस्था व उर्जा विभाग, बँकिंग सेवा, आयटी सेवा व जीनावश्यक पुरवठ्याशी
निगडीत आहेत, अशा सेवा संपूर्ण क्षमतेसह सुरु राहतील.
औद्योगिक व इतर
वस्तूंची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक, आंतर जिल्हा,
आंतरराज्य वाहतूक शासकीय नियमानुसार अबाधित सुरु राहील. त्याकरिता सर्व अवजड वाहनेही
विनापरवानगी सुरु राहतील.
राज्य शासकीय / केंद्र
शासकीय / शासन अंगीकृत उपक्रमांचे अधिकारी व कर्मचारी, डॉक्टर, नर्स, वैद्यकीय
व्यावसायिक, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर,
वर्तमानपत्र, प्रिंटींग व डिजिटल मीडियाचे कर्मचारी, फार्मा व औषधी संबंधीत मेडिकल
शॉपचे कर्मचारी, दूध विक्रेते, अत्यावश्यक सेवा जसे कृषी बी बियाणे, खते, गॅस
वितरक, पाणीपुरवठा, आरोग्य व स्वच्छता करणारे शासकीय व खाजगी कामगार, अग्निशमन
सेवा, जलनि:सारण तसेच पावसाळ्यादरम्यान करावयाची अत्यावश्यक कामे करणारे, वीज वहन
व वितरण कंपनीचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक
इत्यादींना चारचाकी, दुचाकी (स्वतःकरिता फक्त) वाहन वापरण्यास परवानगी राहील. या
सर्व कर्मचारी/अधिकारी यांनी स्वतःच्या कार्यालयाचे ओळखपत्र तसेच शासकीय कर्मचारी
सोडून इतरांनी स्वतःचे आधारकार्ड सोबत ठेवावे. वाहनाचे आवश्यक परवाने सोबत ठेवावे.
या सर्वांना वाहन फक्त शासकीय कामासाठी अथवा त्यांच्या कामाच्या जबाबदारीनुसार व
शासकीय अथवा त्यांच्या संस्थेने नेमून दिलेल्या वेळेतच वापरता येईल.
या आदेशाची प्रभावी
अंमलबजावणी करण्याकरिता संबंधित तहसिलदार हे इन्सिडंट कमांडर राहतील. या आदेशाचे
उल्लंघन करणारी व्यक्ती भा.दं.वि. कलम 188, 269, 270, 271 तसेच आपत्ती व्यवस्थापन
कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य तरतुदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असे
आदेश जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी पारित केले आहेत.
०००००
Comments
Post a Comment