गंदगी मुक्त भारत अभियानांतर्गत सर्वत्र घेतली जाणार स्वच्छतेची शपथ
अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या
निर्देशानुसार दि.8 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2020
या कालावधीत गंदगी मुक्त भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत दि. 15 ऑगस्ट
2020 रोजी शाळा, ग्रामपंचायत, शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था व विविध संघटनांची
कार्यालये या ठिकाणी उपस्थितांनी मास्क वापरून व सामाजिक अंतर ठेवून ध्वजारोहणानंतर
स्वच्छतेची शपथ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील
व प्र.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) दिप्ती पाटील यांनी केले
आहे.
यावेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात
येणार आहे, ती पुढीलप्रमाणे--
गंदगी मुक्त भारत
अभियान
स्वच्छतेची शपथ
* मी अशी शपथ घेतो/घेते की, मी स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहीन आणि त्यासाठी
वेळही देईन. मी स्वतः प्रत्येक आठवड्यातून 2 तास श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पाला
पूर्ण करीन.
* मी गुटखा व तंबाखू खाणार नाही तसेच सार्वजनिक ठिकाणी
थुंकणार नाही.
* मी स्वतः वैयक्तिक किंवा सार्वजनिक शौचालयाचा वापर करेन,
उघड्यावर शौचास जाणार नाही व इतरांनाही शौचालयाचा वापर करण्यास प्रवृत्त करेन.
* मी स्वतःच्या घराबरोबरच सार्वजनिक ठिकाणे, शाळा, शासकीय
कार्यालय स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करेन.
* मी गावातील सांडपाण्याचा वैयक्तिक व सार्वजनिक स्तरावर
व्यवस्थापन करण्यात सहभागी होईन तसेच इतरांनाही सहभागी होण्यास प्रवृत्त करेन.
* मी माझ्या घरातील ओला व सुका कचऱ्याचे घरगुती पातळीवर
वर्गीकरण करीन. कचरा उघड्यावर टाकणार नाही. सार्वजनिक ठिकाणी देखील कचऱ्याचे योग्य
व्यवस्थापन करेन.
* मी जलसंवर्धन व वृक्षलागवडीच्या माध्यमातून पावसाचा प्रत्येक
थेंब अडवेन व पाणी बचतीसाठी हातभार लावेन. तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी
सर्वांना प्रवृत्त करेन.
* मी करोनाच्या साथीच्या आजारांबाबत स्वतः जागरूक राहून
मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर ठेवून स्वच्छतेच्या या नवीन पद्धती अंगीकरीन व इतरांना
जागृत करीन.
* माझी प्रत्येक कृती ही स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले नवीन
पाऊल असेल, त्याद्वारे स्वतःचे व संपूर्ण समाजाचे जीवन सुसह्य होण्यास सहाय्यभूत ठरेल.
जय हिंद जय स्वच्छता
000000
Comments
Post a Comment