फटाकेमुक्त, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करीत प्रत्येक कुटुंबाने एक तरी झाड लावावे --- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील
अलिबाग,जि.रायगड दि. 12 (जिमाका) :- करोना विषाणू
संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी तसेच
सणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कुटुंबाने एक तरी झाड लावावे, असे आवाहन रायगड
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
करोना
विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सुरुवातीपासूनच जिल्हा परिषद प्रशासनातर्फे शासनाने दिलेल्या
सूचनांची योग्य अंमलबजावणी करण्यात आली. जिल्ह्यात करोना विषाणू संसर्ग आटोक्यात
आला असल्याचे चित्र दिसून येते. ही परिस्थिती कायम राहावी, यासाठी हवेतील
प्राणवायूचे प्रमाण अधिक असणे आवश्यक आहे. नागरिकांनी येणाऱ्या सणांमध्ये प्रदूषण
टाळावे, असे जिल्हा परिषद प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
करोना
विषाणू संसर्ग श्वसन प्रक्रियेसंदर्भात निगडित असल्याने हवेची गुणवत्ता उत्तम
राहण्यासाठी, वायूप्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यांशिवाय सण साजरा करावा व सार्वजनिक
वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करावा, घरातील ओल्या व सुक्या कचऱ्याचे घरगुती
पातळीवर वर्गीकरण करावे, उघड्यावर कचरा टाकू नये, प्लास्टिकचा वापर न करता कापडी
अथवा कागदी पिशवीचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, वेळोवेळी हात
स्वच्छ धुवावेत, तसेच सणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कुटुंबाने एक तरी झाड लावावे,
असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment