100 टक्के घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा करणारा उरण तालुका ठरला राज्यात पहिला
अलिबाग,जि.रायगड,दि.04 (जिमाका) : प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी
शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात
जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबावणी करण्यात येत असून जिल्ह्यातील उरण तालुक्यात 100 टक्के
घरांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे 100 टक्के घरांना नळाने पाणी पुरवठा
करणारा उरण तालुका राज्यात प्रथम ठरला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात उरण तालुक्यात
नळ कनेक्शन जोडणीच्या उद्दिष्टांच्या 238.10 टक्के काम करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने जलजीवन मिशन हाती घेतले आहे.
या अंतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.या योजनेच्या
माध्यमातून सुरुवातीला ज्या घरांमध्ये नळ कनेक्शन आहे, त्या घरांची माहिती संकलित करण्यात
आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ज्या घरांमध्ये
वैयक्तिक नळ कनेक्शन नाही अशा घरांना नळ कनेक्शन देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रायगड
जिल्ह्यातील उरण तालुक्यात उल्लेखनीय काम करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण
पाटील, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. वेंगुर्लेकर, उरण पंचायत समिती
गट विकास अधिकारी नीलम गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी- कर्मचाऱ्यांनी योग्य
नियोजन केल्याने उरण तालुका राज्यात 100 टक्के घरांना नळ कनेक्शन देणारा पहिला तालुका
ठरला आहे.
जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री
आदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, विरोधी पक्षनेते
सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, कर्मचारी या सर्वांचे
सहकार्य लाभले.
जलजीवन मिशन अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात घराघरात नळ
कनेक्शन देण्यात येणार असून, उरण तालुक्यातील सर्व घरांमध्ये नळ कनेक्शन देण्यात आले
आहे. या तालुक्यात जर कुणी नव्याने घर बांधले असेल किंवा एखादे कुटूंब कामानिमित्त
तालुक्यात नव्याने स्थलांतरित असेल तर अशा कुटुंबांनी प्रशासनासोबत संपर्क साधून नळ
कनेक्शन मागणी करावी, तसेच उरण व्यतिरिक्त जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यात ज्या कुटुंबाला
वैयक्तिक नळ कनेक्शन नाही त्या कुटुंबांना नळ कनेक्शन देण्याची कार्यवाही सुरू असल्याची
माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.
उरण तालुका नळ कनेक्शन दृष्टीक्षेप:- एकूण कुटुंबे
: 36 हजार 108, एप्रिल 2020 पूर्वी नळ कनेक्शन असलेली कुटुंबे : 26 हजार 962,
2020-21 मधील उद्दिष्ट : 3 हजार 841,
2020-21 मध्ये नव्याने जोडलेले नळ कनेक्शन
: 9 हजार 146, एकूण टक्केवारी : 238.10.
जिल्ह्यात तालुक्यानुसार कुटुंबांकडे असलेली
नळ कनेक्शन (टक्केवारी) उरण : 100 टक्के, म्हसळा : 88.40 टक्के,खालापूर : 78.28 टक्के,
पनवेल : 78.77 टक्के, कर्जत : 60.05 टक्के, माणगाव : 74.57 टक्के, रोहा : 68.37 टक्के,
महाड : 69.55 टक्के, पोलादपूर : 65.86 टक्के, मुरुड : 56.17 टक्के, अलिबाग : 56.93
टक्के, श्रीवर्धन : 86.85 टक्के, तळा : 63.03 टक्के, सुधागड : 49.62 टक्के, पेण :
44.87 टक्के एकूण : 68.79 टक्के.
Comments
Post a Comment