अन्... जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह ..
अलिबाग,जि.रायगड,दि.22
(जिमाका):- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती उज्वला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे बालविवाह थांबविण्याबाबतची यशस्वी कार्यवाही करण्यात आली.
मापगाव येथे बालविवाह होत असल्याची माहिती चाईल्ड
लाईनच्या माध्यमातून मिळाल्यावर प्रत्यक्ष गावात भेट देवून एकूण चार बालकांचे बालविवाह
होत असताना बालकांचे आई-वडील व नातेवाईकांना समज देण्यात आली व योग्य ते मार्गदर्शन
करण्यात आले.त्या सर्वांचे समुपदेशन करण्यात आले.
मापगाव येथील रहिवासी असलेली भावंडे, त्यापैकी मुलीचे
वय 16 वर्षे व मुलाचे वय 19 वर्षे होते. मुलीचा विवाह निश्चित करण्यात आलेल्या मुलाचे
वय 19 वर्षे व मुलाचा विवाह निश्चित करण्यात आलेल्या मुलीचे वय 17 वर्षे इतके होते.
हे सर्वजण पोयनाड नागझरी आदिवासी वाडी येथील रहिवासी आहेत. एकंदरीत चारही नियोजित वधू-वर अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले.
बालविवाह प्रतिबंधक
अधिनियम 2006 अन्वये अल्पवयीन बालकांचे बालविवाह होणार नाही, याबाबत संबंधितांना सूचना
देण्यात आल्या असून पालकांकडून जबाबनामा लिहून घेऊन पालकांना समज देण्यात आली आहे. तसेच अल्पवयीन बालकांना बाल कल्याण समितीसमोर उपस्थित
राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
यावेळी माणगाव
येथील पोलीस पाटील श्रीमती अपेक्षा टुळे, अलिबाग पोलीस स्टेशनमधून श्रीमती मिनल मगर,
जिल्हा परिविक्षा अधिकारी श्रीमती एस.एम.वाघमारे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती
सुजाता सपकाळ, समुपदेशक अजिनाथ काळे, क्षेत्रीय कार्यकर्ता दशरथ चौधरी, संदीप गवारे,
चाईल्ड लाईन प्रतिनिधी अमोल जाधव, सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रतिनिधी श्रीमती मोहिनी
रानडे, प्रशांत घरत इत्यादी उपस्थित होते.
या प्रकरणी जिल्हा
बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सुजाता सपकाळ यांनी गाव बाल संरक्षण समिती सदस्य यांना
व आई-वडील यांना मार्गदर्शन केले तसेच त्यांचे समुपदेशन करून त्यांना समजही देण्यात
आली, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती उज्वला पाटील यांनी दिली
आहे.
00000000
Comments
Post a Comment