कृषी दिन कार्यक्रमामध्ये राज्यस्तरीय रब्बी हंगाम 2020 मधील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सत्कार

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.30 (जिमाका) :- खरीप हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन दि.21 जून 2021 ते 01 जुलै 2021 या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम यशस्वीपणे पार पाडली जात आहे. दि. 01 जुलै 2021 रोजी महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या कृषी दिनी या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप आहे.

नुकतेच कृषी विभागामार्फत सन 2020 च्या रब्बी हंगामाचे रब्बी ज्वारी, गहू, हरभरा आणि करडई या पिकांसाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीचे पीकस्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात आले. दि.01 जुलै 2021 रोजी मुंबई येथे दु.12.30 वाजता मंत्रालय, मुंबई येथे होणाऱ्या कृषी दिन कार्यक्रमामध्ये या राज्यस्तरीय रब्बी हंगाम 2020 मधील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार होणार आहे.

या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री,  उपमुख्यमंत्री,  महसूल मंत्री, कृषीमंत्री, फलोत्पादन मंत्री, कृषी राज्यमंत्री, फलोत्पादन राज्यमंत्री, कृषी सचिव आणि कृषी आयुक्त हे मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे हे कृषी विभागाच्या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाचे यू-ट्यूब चॅनल www.youtube.com/C/ AgricultureDepartmentGoM वरून होणार  असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत सर्व शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक