आपत्तीवर मात करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे कर्जत उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी- ठाकूर यांचे आवाहन

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.9 (जिमाका):- भारतीय हवामान विभागाने दि. 09 ते 12 जून 2021 या कालावधीमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिलेला आहे.

         या पार्श्वभूमीवर अनावश्यक घराबाहेर न पडता घरी राहूनच आपत्तीवर मात करण्यासाठी शासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने कर्जत उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली परदेशी- ठाकूर यांनी केले आहे.

     कर्जत उपविभागातील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व शासकीय व स्थानिक प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने काम करण्याच्या दृष्टीकोनातून दि.8 जून 2021 रोजी सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा यांची ऑनलाईन बैठक कर्जत उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली परदेशी-ठाकूर यांनी आयोजित केली होती.

      या ऑनलाईन बैठकीत उपविभागातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष कर्जत/खोपोली/माथेरान नगरपरिषद, सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत/खालापूर, तहसिलदार कर्जत/खालापूर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती कर्जत/खालापूर, मुख्याधिकारी कर्जत/खोपोली/माथेरान नगरपरिषद/खालापूर नगरपंचायत,मंडळ अधिकारी, ग्रामसेवक  सहभागी झाले होते.

 या बैठकीमध्ये दरडग्रस्त भागातील, पूरप्रवण भागातील व धोकादायक इमारतीमधील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. या दृष्टीकोनातून जवळच्या सुरक्षित निवारा केंद्राचे नियोजन करुन त्या ठिकाणी पाणी, मूलभूत सुविधा व स्वच्छतागृहाची सुविधा असेल, याची दक्षता घेवून अन्नधान्य, खाद्यपदार्थांची उपलब्धता होईल, याचे नियोजन स्थानिक प्रशासनामार्फत केले जाईल. तरी पूरप्रवण, दरडग्रस्त भागातील व अतिधोकादायक इमारतीतील नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देवून आपत्कालीन  परिस्थितीत नजीकच्या निवारा केंद्रात वा आपल्या नातेवाईकांकडे दि.09 जून 2021 पूर्वी तात्पुरत्या स्वरुपात सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन करण्यात आले.    

             याबाबत सर्व नगरपरिषदा, सर्व नगर पंचायत, ग्रामपंचायत यांनी स्पीकरद्वारे सर्व नागरिकांना अतिवृष्टीबाबत सूचना प्रसारित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या कालावधीत तालुक्यासाठी नियंत्रण कक्ष 24 तास कार्यन्वित करण्यात आले आहे. सर्व स्थानिक यंत्रणांनी/नागरिकांनी  आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे. जेणेकरुन मदतकार्य वेळेत सुरु करणे शक्य होईल, असे सांगण्यात आले.

     नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्र.तहसिल कार्यालय,कर्जत 02148-222037, तहसिल कार्यालय,खालापूर 02192-275048 व जिल्हाधिकारी  कार्यालय, रायगड-अलिबाग 02141-222118 असे आहेत.

                तसेच जिल्हा मार्ग, अंतर्गत रस्त्यावर झाडे, दरड पडून वाहतूक विस्कळित होणार नाही, याबाबत उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. कर्जत उपविभागातील धोकादायक/उंच होर्डिंग/जाहिरातींचे बोर्ड काढून टाकण्यात यावेत. मेनहोल उघडे राहणार नाहीत, त्यांना झाकण टाकणे वा बॅरीकेटींग करणे, याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.

            त्याचप्रमाणे सर्व नागरिकांनी अतिवृष्टीच्या अनुषंगाने काळजी घेण्याबाबत आवाहन करण्यात आले असून नागरिकांना पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत:- 

1)घराच्या अवती-भोवती वादळामुळे/अतिवृष्टीमुळे कोणत्याही वस्तू, विजेचे खांब किंवा तारा, झाडे, होर्डींग्ज/बोर्ड इत्यादी पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूपासून लांब राहावे. तसेच प्रत्येक बाब तात्काळ स्थानिक प्रशासनाच्या निर्दशनास आणून द्यावी.

2)आपले पशूधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे.

3)आपल्या जवळ दैनंदिन लागणारी औषधे, केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदील), बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी इत्यादी वस्तू ठेवाव्यात.

4)अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये किमान 3 दिवस पुरतील, असे सुका मेवा/खाद्यपदार्थ जवळ ठेवावेत, सोबत आवश्यक अन्नधान्य, पिण्याचे पाणी औषधे जवळ ठेवावे. 5)पिण्याचे पाणी शुद्धीकरण करुन वापरावे. उदा.पाणी उकळून प्यावे तसेच पाण्यात मेडीक्लोर मिसळावे.

6) अतिवृष्टी फटका टाळण्यासाठी दरडप्रवण भागातील व अतिधोकादायक इमारतीतील तसेच नदीकिनारी राहणाऱ्या सखल भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी. तसेच प्रशासनामार्फत केलेल्या निवारागृहामध्ये स्थलांतरीत व्हावे.आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्त्वाचा असल्यामुळे प्रथम जीवितास प्राधान्य द्यावे.

7)या कालावधीमध्ये नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडूच नये. 

8) दि.11 जून ते दि.13 जून 2021 या कालावधीत अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार असल्याने आपल्याला आवश्यक अन्नधान्य, भाजीपाला, औषधे इत्यादीचा साठा जवळ बाळगावा.      

      या आपत्कालीन परिस्थितीत अनावश्यक घराबाहेर न पडता घरी राहूनच आपत्तीवर मात करण्यासाठी शासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने कर्जत उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली परदेशी- ठाकूर यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक