सुयोग्य बदलासह पीक स्पर्धा खरीप हंगाम 2021 साठी नव्याने स्पर्धा जाहीर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकासाठी दि.31 जुलै पूर्वी तर इतर खरीप पिकासाठी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन
अलिबाग,जि.रायगड,
दि.12 (जिमाका) : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये
शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा
प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या
शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्याचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन
अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी
शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना
होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेवून राज्यात कृषी
विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
या खरीप हंगामापासून पूर्वीच्या पीकस्पर्धेच्या
निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करून नव्याने स्पर्धा राबविण्यात आहे.
या
पीक स्पर्धेतील महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत :-
पीक स्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक
आधारभूत धरण्यात येईल.
खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके
भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी). तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग,
सूर्यफूल अशी एकूण 11 पिके आहेत.
प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण
गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5,पीकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांचे शेतावर त्या
पिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेसे अर्ज प्राप्त
झाल्यानंतर संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील.
तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी 05 व
आदिवासी गटासाठी 04, स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त
पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी
रक्कम रुपये 300/- आहे.
अर्ज
दाखल करण्याची तारीख:-
1) मूग व
उडीद पीक-31 जुलै, 2021, 2) भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तूर, सोयाबीन,
भुईमूग व सूर्यफूल- 31 ऑगस्ट 2021
पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या
स्पर्धकाचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन,
7/12, 8अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास या कागदपत्रांची
पूर्तता करून कृषी कार्यालयात द्यावे.
पीक स्पर्धा विजेत्यांसाठी बक्षीस स्वरूप :-
स्पर्धा
पातळी, तालुका पातळी- सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षीस रुपये-पहिले बक्षीस रुपये 5
हजार, दुसरे बक्षीस रु.3 हजार, तिसरे बक्षीस-रु.2 हजार
स्पर्धा
पातळी-जिल्हा पातळी- सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये-पहिले बक्षीस रुपये 10
हजार, दुसरे बक्षीस रु.7 हजार, तिसरे बक्षीस-रु.5 हजार
स्पर्धा
पातळी-विभाग पातळी- सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षीस रुपये-पहिले बक्षीस रुपये 25
हजार, दुसरे बक्षीस रु.20 हजार, तिसरे बक्षीस-रु.15 हजार
स्पर्धा
पातळी-राज्य पातळी, सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षीस रुपये-पहिले बक्षीस रुपये 50
हजार, दुसरे बक्षीस रु.40 हजार, तिसरे बक्षीस-रु.30 हजार
पीक
स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, अधिक माहितीसाठी आपल्या क्षेत्राचे कृषी सहाय्यक/कृषी
पर्यवेक्षक/तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,
तसेच रब्बी
हंगाम 2020 मध्ये पीक स्पर्धेसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
त्याप्रमाणे खरीप हंगाम 2021 साठी देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मूग व उडीद
पिकासाठी दि.31 जुलै पूर्वी तर इतर खरीप पिकासाठी 31 ऑगस्ट 2021 पूर्वी सादर करून
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड-अलिबाग श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment