उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार अलिबाग यांच्या निवासस्थानाकरिता तालुक्यातील मौजे वरसोली येथील शासकीय जागा हस्तांतरित
अलिबाग,जि.रायगड दि.30 (जिमाका):- उपविभागीय अधिकारी
कार्यालय, तहसिलदार कार्यालय ही नागरिकांसाठी क्षेत्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाची
कार्यालये मानली जातात. या कार्यालयातून जनतेची महसूलविषयक सर्व प्रकारची महत्त्वाची
कामे केली जातात. त्याचप्रमाणे अलिबाग हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून नैसर्गिक आपत्ती,
निवडणूक कालावधीत रात्री-अपरात्री तसेच इतर महत्वाच्या कामानिमित्त रात्रंदिवस शासकीय
कामकाज करावे लागते. या कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबतीतील
ही वस्तुस्थिती लक्षात घेता त्यांच्याकरिता सुस्थितीतील शासकीय निवासस्थाने असणे, ही
बाबही तितकीच महत्वाची आहे.
या उद्देशाने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या
विषयाचा पाठपुरावा करुन जिल्हा प्रशासनास त्याप्रमाणे निर्देश दिले आहेत.
या
पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्या निवासस्थानाकरिता
मौजे वरसोली, ता.अलिबाग येथील स.नं./हि.नं.238/2/अ2/1 क्षेत्र 0.19.80 हे.आर.इतके क्षेत्र
08 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयानुसार भोगाधिकार
मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने कब्जा हक्काने उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी
व तहसिलदार यांच्या निवासस्थानाच्या बांधकामाकरिता हस्तांतरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी
डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी नुकतेच जारी केले आहेत.
यामुळे
खऱ्या अर्थाने महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या राहण्याचा प्रश्न मिटण्यास
हातभार लागणार असून त्यामुळे त्यांचे कामकाज गतिमान होऊन जनतेला सोयी सुविधा सुलभतेने
मिळतील. विविध प्रशासकीय कार्यालयांच्या नव्या इमारतीसाठी व अद्ययावतीकरणासाठी तसेच
अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या प्रश्नांसाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे
करीत असलेल्या पाठपुराव्यामुळे प्रशासन निश्चितच गतिमान होण्यास मोठा हातभार लागणार
आहे. यामुळे जिल्ह्यातील जनतेमध्ये पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या कामाविषयी सर्वत्र
समाधान व्यक्त केले जात आहे.
00000
Comments
Post a Comment