ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांनी नोंदणी करावी--उपजिल्हाधिकारी सुषमा सातपुते
अलिबाग,जि.रायगड,दि.24(जिमाका) :- केंद्र शासनाने असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, 2008 पारित केला आहे. त्यानुषंगाने बिडी कामगार, मच्छीमार, सुतार कामगार, सेरीकल्चर कामगार, भाजी आणि फळे विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, यंत्रमाग कामगार यांच्यासारख्या विविध 300 व्यवसाय गटातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस (NDUW) तयार करण्यासाठी दि. 20 ऑगस्ट 2021 पासून असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल चे उद्घाटन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय डेटाबेसच्या आधारावर असंघटित कामगारांकरिता सामाजिक सुरक्षा योजना अंमलात आणल्या जाणार आहेत. केंद्र शासनाने ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांच्या नोंदणीबाबत मार्गदर्शक तत्वे दिली आहेत.
सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अन्वये असंघटित कामगारांची व्याख्या :- गृह उद्योग करणारा, स्वयंरोजगार करणारा, असंघटित क्षेत्रात वेतनावर काम करणारा, संघटीत क्षेत्रातील कामगार ज्याला औद्योगिक विवाद अधिनियम, 1947 आणि सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 मधील Chapters III to VII जसे नुकसान भरपाई, कर्मचारी राज्य विमा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, प्रसूती लाभ आणि उपदान प्रदान लागू नाही.
नोंदणीकरिता पात्रता :- असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा वय वर्ष 16 ते 59 दरम्यान कामगार, तो आयकर भरणारा नसावा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा, तो असंघटित कामगार शासनाने निश्चित केलेल्या 300 उद्योगातील असणे आवश्यक आहे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :- आधार कार्ड, बँक पासबुक (राष्ट्रीयकृत बँक अथवा IFSC कोड असलेली इतर कोणतीही बँक), सक्रिय मोबाईल नंबर (OTP करीता स्वतःचा अथवा कुटुंबातील अन्य व्यक्तीचा स्वयंनोंदणी करण्यासाठी कामगाराचा सक्रिय मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
नोंदणी कोठे करावी:- स्वतः, नागरी सुविधा केंद्र (CSC), कामगार सुविधा केंद्र, eSHRAM Portal URL: eshram.gov.in.
चौकशी:- नॅशनल हेल्पलाईन नंबर: 14434, टोल फ्री नंबर 18001374150 केंद्र शासनाचे कामगार व रोजगार मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार असंघटित कामगारांची नोंदणीची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे आहे :-
नागरी सुविधा केंद्रामार्फत बँक खात्याचा तपशिल, ईमेल आडी, वारसाचा तपशिल व सक्रिय मोबाईल नंबर याबाबतचा तपशिल अद्ययावत केला जाईल, कामगाराची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यास कामगारास नागरी सुविधा केंद्रातील (CSC) प्रतिनिधीकडून (VLE) आकारले जाईल, कामगारांना नवीन नोंदणी करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाहीत. परंतु कामगारास कोणतीही माहिती अद्ययावत करावयाची असल्यास रु. 20/- नागरी सुविधा केंद्रातील (CSC) प्रतिनिधीकडून (VLE) आकारले जातील. कामगाराची नोंदणी झाल्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY)चे या वर्षाचे वार्षिक अंशदान रु. 12/- केंद्र शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील असंघटित
कामगारांनी नॅशनल डेटाबेस फॉर अनऑर्गनाईज वर्कर्स (NDUW) वर जास्तीत जास्त नोंदणी
करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती सुषमा सातपुते यांनी केले आहे.
०००००००
Comments
Post a Comment