मदत व बचावकार्यासाठी सहा रबरी बोटी जिल्ह्यात दाखल सामाजिक संस्था आणि प्रशासकीय यंत्रणांना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते झाले वितरण

 


 

अलिबाग, दि.5 (जिमाका):- पूर परिस्थितीच्या काळत मदत व बचाव कार्य वेगाने सुरु करता यावे, यासाठी राज्य शासनाकडून 6 रबरी बोटी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या बोटींचे सोमवार, दि.3 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सामाजिक संस्था आणि प्रशासकीय यंत्रणांना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

आपत्ती सौम्यीकरण योजना निधींतर्गत 116 रबरी बोटींची राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातील 6 बोटी रायगड जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या होत्या.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक उपस्थित होते. महाड येथील साळुंखे रेस्क्यू टिमला 2, रोहा येथील वाईल्ड वॉटर अडव्हेंचर्स पथकाला 1, खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीला संस्थेला 1, रायगड पोलिसांना 1 तर महाड नगरपालिकेला 1 रबरी बोट उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्ह्याला दरवर्षी पूर समस्येला सामोरे जावे लागत आहे, अशा वेळी पूरात अडकून पडलेल्या नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध व्हावी, मदत व बचावकार्यासाठी स्थानिक यंत्रणा सक्षम व्हाव्यात, या दृष्टीकोनातून या सहा बोटी, दरवर्षी मदत व बचाव कार्यात मदत करणाऱ्या सामाजिक संस्था आणि प्रशासकीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सात लाख रुपये किंमतीच्या संस्थांना मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र बोटीची देखभाल दुरुस्ती संबंधित संस्थांनी करायची असून, आपत्तीच्या काळात तातडीने मदत व बचाव कार्यासाठी हजर होणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

या बोटी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज आहेत. पूर परिस्थितीत वेगाने प्रवास करणेही शक्य होणार आहे. आपत्तीच्या काळात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत दाखल होण्यास वेळ लागतो, अशा वेळी स्थानिक पथकांमार्फत मदत व बचाव कार्य सुरु करणे यामुळे शक्य होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित सामाजिक संस्थाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.

जिल्ह्यात दरवर्षी सावित्री कुंडलिका, आंबा, उल्हास आणि पाताळगंगा नद्यांना पूरसमस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे महाड, रोहा, नागोठणे, खोपोली, आपटा, रसायनी परिसरात पूरस्थिती निर्माण होते. मदत व बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रतिसाद दलाच्या तुकड्यांना मुंबई, पुणे, सातारा येथून पाचारण करावे लागते. त्यामुळे या पथकांना रायगड जिल्ह्यात पोहोचण्यासाठी सात ते आठ तासांचा कालावधी लागतो. अशा वेळी स्थानिक बचाव पथकांची मदत उपयुक्त ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन आपत्ती सौम्यीकरण योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यासाठी 6 रबरी बोटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

रबरी बोटीची आसन क्षमता 10 जणांची आहे. त्यासाठी आवश्यक इंजिन लाईफ जॅकेट्स, स्ट्रेचर्स इत्यादी साहीत्यही जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक