रायगड जिल्ह्यातील पर्यटन विकासकामांसाठी रु.11 कोटी 90 लाख 4 हजार निधीस प्रशासकीय तर रु.3 कोटी 77 लाख रक्कमेच्या निधी वितरणास शासनाची मान्यता प्रदान

 पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश 

अलिबाग, दि.31 (जिमाका):- कोकणातील ग्रामीण भागातील भूमीपुत्रांना त्यांच्या गावात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच कोकणातील विकास कामांची गती वाढविणे, ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाचा विकास होणाऱ्या गावांमध्ये पर्यटनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे व पर्यायाने गावांचा विकास करणे, या उद्देशाने राज्य शासनाने प्रादेशिक पर्यटन विकास ही योजना घोषित केली.

रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा जिल्हा मानला जातो. या जिल्ह्याला भरभरून निसर्गसंपदा लाभली आहे. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी, येथील स्थानिकांना त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासाठी व त्याकरिता लागणारा निधी शासनाकडून मिळविण्याकरिता त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. त्यांच्या या प्रयत्नांतूनच शासनाकडून जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासकामांसाठी तब्बल 11 कोटी 90 लाख 4 हजार रुपयांच्या विविध विकासकामांना शासनाची प्रशासकीय मान्यता मिळवून त्यापैकी 3 कोटी 77 लाख रक्कमेचे वितरीत करण्याचे आदेशही मिळविण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.

त्याची माहिती पुढीलप्रमाणे:-

·         कुडा लेणी, ता.तळा येथील पर्यटन मूलभूत सोयीसुविधा निर्माण करणे (प्रशासकीय मान्यता - रु.5 कोटी, वितरीत रक्कम – रु.1 कोटी 25 लाख),

·         देवकुंड, ता.माणगाव येथे पर्यटन सुविधा निर्माण करणे (प्रशासकीय मान्यता - रु.5 कोटी, वितरीत रक्कम – रु.1 कोटी 25 लाख),

·         कर्नाळा अभयारण्य, ता.पनवेल येथे पर्यटक सुविधा निर्माण करणे (प्रशासकीय मान्यता - रु.1 कोटी 63 लाख 40 हजार, वितरीत रक्कम – रु.1 कोटी),

·         फणसाड अभयारण्य, ता.मुरुड पर्यटन विकास (प्रशासकीय मान्यता - रु.27 लाख, वितरीत रक्कम –रु.27 लाख),

अशा प्रकारे एकूण 11 कोटी 90 लाख 4 हजार रुपयांच्या रायगड जिल्ह्यातील पर्यटनासंबंधीत विविध विकासकामांना शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे आणि त्यापैकी 3 कोटी 77 लाख रक्कमेचे वितरीत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 

अशा प्रकारे जिल्ह्याचा विविध क्षेत्रातील विकास साधण्यासाठी पालकमंत्री या नात्याने कु.आदिती तटकरे या सतत कार्यरत आहेत. जिल्ह्यातील विविध विषयांबाबतच्या विकासकामांसाठी निधी मिळविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना राज्य शासनाकडून नेहमीच सहकार्य मिळत आले आहे, याकरिता पालकमंत्री कु.तटकरे यांनी राज्य शासनाचे विशेष आभार मानले आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक